
जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लिंबूचे दर तुलनेने स्थिर होते. ऑफ सिझनमध्ये लिंबू ४० ते ५० रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र फेब्रुवारीनंतर तापमान वाढू लागल्याने बाजारातील मागणी वाढली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर दिसून येऊ लागला. सध्या किरकोळ विक्रीमध्ये एक लिंबू ५ ते १० रुपयांना विकला जात आहे.
दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
बाजारात उपलब्ध असलेल्या लिंबूच्या आकारानुसार एका किलोमध्ये साधारणपणे २० ते २५ लिंबू बसत असल्याचे विक्रेते सांगतात. उन्हाळा जवळ येत असल्याने लिंबू सरबत विक्रेते, रसवंतीगृह, उसाच्या रसाच्या गाड्या तसेच कोल्ड्रिंक्स दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे लिंबूची आवक असूनही बाजारातील दर स्थिर राहत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, येत्या काही आठवड्यांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढल्यास लिंबूच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती विक्रेते शिवराम तोडकर यांनी दिली. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबूचे दर चढे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे सुद्धा वाचा : दूध उकळताच झाला रबरासारखा गोळा; पाटस परिसरातील धक्कादायक प्रकार
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका
राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल–मे महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. शेती, पशुधन, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे.