
Maharashtra Farmer Loan Waiver
अलिबाग : शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १,८५९ शेतकऱ्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये इतकी रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. ही रक्कम रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करून त्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला.
या योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वाटप करण्यात आलेले अल्पमुदत पीककर्ज तसेच पुनर्गठित मध्यम मुदत कर्ज, जे ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड झालेले नाही, अशा कर्जाच्या मुद्दल व व्याजासह कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येत आहे.
रायगडमध्ये पावसाची स्थिती गंभीर; 2470.6 मिमी पाऊस, पनवेलमध्ये 5 जणांचा मृत्यू
• याशिवाय, २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाची तरतूद करण्यात आली आहे.
• अशा शेतकऱ्यांना किमान ५ हजार रुपये ते कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
अंमलबजावणीत पारदर्शकता आणि योग्य समन्वयासाठी राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर नियंत्रण समित्या कार्यरत आहेत. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, बँक व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली योजनेची कार्यवाही सुरू आहे. प्राप्त झालेल्या १० तक्रारींपैकी ५ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
• ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा CSC केंद्रावर जाऊन अॅग्रीस्टॅक/फार्मर आयडी नोंदणी तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आकडेवारी
१,८५९ — शेतकऱ्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये शासनाकडून प्राप्त
१२,६८२ — शेतकरी खात्री पोर्टलवर
आधार प्रमाणीकरण टक्केवारी — ३९ टक्क्यांपेक्षा अधिक
• अॅग्रीस्टॅक क्रमांक नसल्याने प्रलंबित खाती — ४,३६६
• मृत खातेदार — ५३७
• दुसऱ्या जिल्ह्यातील खातेदार — १४४