
बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी
पुणे : पुणे मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याची एक महत्वाची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बारामती बसस्थानकाचा ज्या धर्तीवर अत्यंत आधुनिक, देखणा, हायटेक आणि सर्वसुविधांयुक्त कायापालट केला आहे. ते आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वास्तू आहे. दादांच्या याच दूरदृष्टीचा आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करून पौड येथील बसस्थानकाचे नूतनीकरण करणे सहज शक्य आहे, असे निम्हण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुणे जिल्हातील मुळशी तालुका हा पर्यटन, शिक्षण, आणि औद्योगिक दृष्ट्या वेगाने विकसित होत असलेला तालुका आहे. तालुक्यातील मुख्य पौड बसस्थानकाची जागा ही आमच्या खात्रीलायक माहितीप्रमाणे पूर्णपणे शासकीय मालकीची असून मोठी आहे. पुणे-कोलाड महामार्ग हा पौड मधूनच जात आहे पुढे हा महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाला जोडला असल्याने कोकणात जाणारी वाहतूक कैक पटीने वाढली आहे. या संपूर्ण महामार्गावरील प्रवासी आणि पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता “पौड” बसस्थानक हे मुख्य जंक्शन ठरणार आहे. भविष्यातील या वाढत्या वाहतुकीचा आणि पुढील १० वर्षांतील शहरीकरणाचा विचार करून पौड बसस्थानकाचा विस्तार वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मनसेचे सुहास निम्हण म्हणाले. यावेळी अँन्थोनी आढाव, अनिल आहिरे, अनिल मातेरे, धनंजय टेमघरे, किशोर इंगवले, मोहन भिलारे, सुनिल भिलारे,सुभाष आमले उपस्थित होते.
सुहास निम्हण यांनी निवेदनात मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
१) पुणे-कोलाड महामार्ग व भविष्यातील गरजेचा विचार करून डिजिटल टाइम-टेबल डिस्प्ले, हाय-टेक सीसीटीव्ही यंत्रणा असलेली सुसज्ज इमारत.
२) पुण्याहून पौड व मुळशीतील इतर ठिकाणी जाण्यासाठी येणाऱ्या पीएमपीएमएल बसेस आणि राज्याच्या इतर भागातून येणाऱ्या एसटी बसेससाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म आणि एक मोठा बसथांबा.
३)चालक-वाहक व प्रवासी यांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी बसस्थानक परिसरात सुसज्ज विश्रामगृह.
४) एसटीच्या प्रवाशांना विविध पाससाठी लाईनमध्ये ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून विशेष जलद बस पास केंद्र.
५) प्रवाशांच्या बस फेऱ्यांबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि एसटी महामंडळाच्या विविध सवलती योजनांचे (उदा. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक सवलत) फायदे नागरिकांना थेट मिळवून देण्यासाठी एक मोठे केंद्रीय कार्यालय येथे सुरू करावे.
६) महामार्गावरील संभाव्य अपघात आणि आपत्कालीन प्रसंगी तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्थानक आवारातच २४ तास सुरु असणारे “प्राथमिक उपचार केंद्र” असावे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था असावी.
७) सुसज्ज स्वच्छतागृह व महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारणी करणे.
पुणे-कोलाड महामार्गामुळे पौडचा होणारा कायापालट लक्षात घेता, भविष्यातील गरजा भागवण्यासाठी शासनाने हे पाऊल आत्ताच उचलणे अत्यंत गरजेचे आहे. तरी आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन, संबंधित एसटी महामंडळ, पीएमपीएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पौड येथील शासकीय जागेची संयुक्त पाहणी करून ‘भविष्याभिमुख आराखडा’ (Future-Ready Plan) तयार करण्याचे आदेश द्यावेत. अशा प्रकारचे निवेदन आज १४ ऑगस्ट २०२६ रोजी सुहास निम्हण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार शंकर मांडेकर, खासदार सुप्रिया सुळे यांना पाठवले आहे.
हे सुद्धा वाचा : देवळ्याजवळ भीषण अपघात, बसने दुचाकीला चिरडले; मृत्यूचा आकडाही समोर