
दोन दिवसांपूर्वी पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
हवामान बदल होण्याची शक्यता
पुणे: गेल्या चार दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, शुक्रवारी (दि. ३) रोजी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामानाच्या स्थितीत बदल झाला. पावसाने दिलेल्या या उसंतीमुळे पुण्याचे किमान तापमान २ अंश सेल्सिअसने वाढले असून, पुढील दोन दिवसांत हवामानात आणखी किरकोळ बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि स्थानिक पातळीवर वाढलेल्या उष्णतेमुळे ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे शहरात गेल्या २४ तासांपासून अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या बदलामुळे दुपारच्या वेळी जाणवणारा उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला असून, सायंकाळच्या सुमारास किंवा रात्री पुणे शहर आणि परिसरातील उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात.
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि. ४) कमाल तापमान स्थिर राहिले तर किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर १७.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ राहिले. रविवारी (दि. ५) शहर आणि परिसरात ३५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर १८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. तसेच रविवारपासून चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
पुण्यात अवकाळीचा हाहाकार
अवकाळी पावसाने गुरुवारी शहरात कहर केला. घरात पाणी शिरणे, झाडपडी, रस्त्यांवर पाणी तुंबणे, सीमा भिंत कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. शहरात २६० ठिकाणी पाणी तुंबले तर ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली. यात सिंहगड रस्त्यावर झाड पडल्याने एक महिला मृत्यूमुखी पडली. विशेषतः शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागात अति मुसळधार पावसाने गुरुवारी दुपारी झोडपले. या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या पावसाळापूर्व कामाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार; पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, एका महिलेचा मृत्यू
पुण्यातील प्रमुख रस्त्यासह काही भागाला नद्यांचे स्वरूप आले होते. अग्निशमन दल, पुणे पोलिस पालिका प्रशासनाने रस्त्यावर उतरून साचलेले पाणी काढण्यासोबतच रस्त्यावरून झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक भागात नागरिकांनीच स्वतःहून रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, अनेक भागात वाहने पाण्यात अडकली गेली. वाहने मध्येच बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. तर दुसरीकडे काही रस्त्यांवर चार ते पाच फुट पाणी साचल्याने रस्ताच काही तास बंद ठेवण्याची वेळ आली. शहरातील केडवीनगर, सिंहगड रोड, बाणेर, बालाजीनगर, विश्रांतवाडी, स्वारगेट, कोथरूड, धायरी, वाकड, हडपसर, वारजे, डंकेवाडी या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते.