
झाडे जगवणे ही काळाची गरज :- बाळासाहेब जानराव
पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), पुणे शहर पर्यावरण आघाडी आणि एनप्लांट्स वृक्ष संवर्धन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण आणि देशी वृक्ष संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
निलेश राजेंद्र रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे शहर उपाध्यक्ष अर्जुन आल्हाट हुलगेश चलवादी, श्याम सदाफुले, फिरोज खान, अक्षय अवसरमल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब जानराव म्हणाले, झाडे जगवणे ही काळाची गरज आहे. जर झाडे जगवली नाही तर निसर्गाचा मोठा ऱ्हास होऊ शकतो आणि पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे तापमानामध्ये 45 ते 46 होऊ शकते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरापुढे झाड लावले पाहिजे आणि जे शेतात झाड आहेत ती जगवलीच पाहिजे, असा मोलाचा संदेश जानराव यांनी दिला. त्यावेळी अर्जुन आल्हाट व इतर मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि देशी वृक्षांचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. एनप्लांट्स वृक्ष संवर्धन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण आठवडाभर नागरिकांना देशी वृक्षांची मोफत रोपे वितरित करण्यात येत आहेत.
या उपक्रमात गोवर्धन सोनवणे, महेंद्र रोकडे, प्रियांका रोकडे, सुलभा रोकडे, प्रफुल्ल काकडे, निखिल भोसले, निशा नायर, निकिता गुप्ता, आयुष गुप्ता यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. “झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरण वाचवा” हा संदेश देत नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
दरवर्षी साजरा केला जातो पर्यावरण दिन
संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या मागे धावत असताना आपण आपल्या अस्तित्वाचा मुख्य आधार असलेल्या निसर्गाला कुठेतरी विसरत चाललो आहोत. याच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी, झाडे लावण्याचा आणि प्रदूषण कमी करण्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा केवळ एक दिवस नसून आपल्या पृथ्वीला, नद्यांना, जंगलांना आणि शुद्ध हवेला वाचवण्यासाठी मानवाने घेतलेली एक प्रतिज्ञा आहे.