
जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
ओतूर/ मनोहर हिंगणे : पुणे जिल्ह्यातील ‘कांद्याचे आगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेला उन्हाळी कांदा आज शेतकऱ्यांसाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला प्रतिकिलो अवघे ९ ते १२ रुपये इतकाच दर मिळत आहे. या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
यंदा अनुकूल हवामानामुळे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, बाजारात आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, आहिनवेवाडी, उदापूर, डिंगोरे, उंब्रज, खामुंडी, डुंबरवाडी, धोलवड आणि नेतवड ही गावे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील कांद्याला देशांतर्गत तसेच बेंगळुरु, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि आखाती देशांत मोठी मागणी असते.
तथापि, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतही यंदा कांद्याचे उत्पादन वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यातच केंद्र सरकारच्या अस्थिर निर्यात धोरणामुळे निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. वारंवार बदलणारे नियम आणि निर्बंध यामुळे निर्यातदारांनी सावध भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून, गॅस तुटवड्याचाही परिणाम दिसून येत आहे. परिणामी, भारतीय कांदा जागतिक बाजारात महाग ठरत असून, स्थानिक बाजारात साठा वाढत आहे. दरम्यान, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरी यांचे दर दुपटीने वाढले आहेत. एका एकरासाठी सुमारे ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. सध्याच्या बाजारभावात हा खर्च वसूल करणेही अशक्य झाले आहे. “किमान वाहतूक खर्च तरी निघेल का?” असा सवाल करत शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
“गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कांद्याला भाव मिळेल या आशेवर आहोत. ९ रुपये किलो भावात आमचे बी-बियाणे आणि खतांचे पैसेही निघत नाहीत. घराचं रेशन, मुलांचे शिक्षण आणि बँकांचे कर्ज कसं फेडायचं? सरकारने तात्काळ किमान २० रुपये हमीभाव दिला पाहिजे, अन्यथा जुन्नरचा शेतकरी रस्त्यावर उतरेल.” — सीताराम डुंबरे, शेतकरी (ओतूर)
“आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कमी”
“आम्ही कांदा खरेदी करायला तयार आहोत, पण पुढे पाठवण्यासाठी मार्केट नाही. युद्धामुळे शिपिंग कंटेनर्सचे भाडे वाढले आहे आणि गॅस तुटवड्यामुळे युरोप-आखाती देशांतील बाजारपेठ मंदावली आहे. स्थानिक बाजारात आवक प्रचंड आहे, त्यामानाने उठाव नसल्याने दरांवर दबाव आहे.” अशी प्रतिक्रीया कांदा व्यापारी शकील तांबोळी यांनी दिली.
“जेव्हा शेतकऱ्याच्या चाळीत कांदा असतो, तेव्हा सरकार निर्यातीवर बंदी घालते किंवा जास्तीचे शुल्क लावते. जेव्हा माल संपतो, तेव्हा भाव वाढतात. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी कायमस्वरूपी निर्यात धोरण हवे. ओतूर पट्ट्यातील शेतकरी आज कर्जबाजारी झाला असून, त्याला सरकारकडून आधार मिळणे गरजेचे आहे.” — ,धनंजय घोलप युवा कांदा उत्पादक (रोहोकडी)
“जुन्नरचा कांदा टिकायला उत्तम असतो, त्यामुळे कर्नाटक आणि गुजरात व दिल्ली बाजारपेठेत याला मागणी असते. मात्र, सध्या ट्रान्सपोर्टेशनचे दर वाढल्याने परराज्यातील व्यापारी कमी दरात माल मागत आहेत. जोपर्यंत निर्यात सुलभ होत नाही, तोपर्यंत दरात मोठी सुधारणा होणे कठीण दिसत आहे.” अशी प्रतिक्रीया दिपक पाडवे (आडते व व्यापारी, ओतूर) यांनी दिली आहे.
कांदा उत्पादकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे
जुन्नर तालुक्यातील शेतकरी आज दुहेरी कात्रीत सापडला आहे. एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे कोसळलेले बाजारभाव. सरकारने केवळ आश्वासने न देता, कांदा उत्पादकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे आणि निर्यातीबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत, तर ही आर्थिक टंचाई ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीच्या खाईत लोटू शकते.