
पहाटे मंदिर प्रदक्षिणा
सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पालखी वीणा मंडपातून निघून मंदिर प्रदक्षिणा करत भरावरस्ता, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती, चावडी चौक आणि महाद्वार चौक मार्गे दर्शन मंडप इमारतीत गांधीवाडा येथे मुक्कामासाठी विसावली. त्यानंतर श्रींची समाज आरती झाली. वारकऱ्यांचा भजनाचा उत्साह परमोच्च होता. वरुणराजाच्या सरी झेलत भजनी मंडळी नाचत-गात, विविध वारकरी खेळ खेळत माऊलींच्या जयघोषात तल्लीन झाली होती.
याप्रसंगी प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे आदी मानकरी, खांदेकरी व आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा’! अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
मर्यादित वारकऱ्यांमध्ये प्रस्थान सोहळा
पूरस्थितीमुळे यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. माऊली मंदिर आणि प्रशासनाने सर्व वारकरी व भाविकांना पालखी प्रस्थानासाठी आळंदीत येऊ नये, असे आवाहन केले होते. संस्थानच्या निर्णयानुसार रथापुढील २७, रथामागील २० आणि पोटभागातील दिंडी अशा एकूण ५६ दिंड्यांमधून मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला. याशिवाय दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी, कर्मचारी, पोलीस, आरोग्य व स्वच्छता यंत्रणा यांच्यासह सुमारे २ हजार व्यक्तींच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
मंदिरात प्रवेश करताच वारकऱ्यांचा उत्साह शिगेला
दिंडी क्रमांक असलेली पाटी, झेंडेकरी, विणेकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, पखवाज वादक, टाळकरी अशा वारकऱ्यांच्या दिंड्या क्रमाने मंदिरात प्रवेश करताच उत्साह शिगेला पोहोचत होता. ‘हो… हो…’ असा जयघोष करत, ‘ज्ञानोबा तुकाराम’ गजरात पाऊली खेळत वारकरी मंदिर प्रदक्षिणा करत होते.
Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका! इंद्रायणीला महापूर, देवस्थानचे आवाहन
पहिला मुक्काम गांधीवाड्यात
प्रस्थानानंतर माऊलींची पालखी आजोळघरी दर्शन मंडप इमारत येथे गांधीवाड्यात विसावली. पहिला मुक्काम आळंदी येथेच असून, गुरुवारी (दि. ९ जुलै) सकाळी ६ वाजता पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, पुरामुळे पालखी मार्गावरील पुलाचे नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. पूल दुरुस्त न झाल्यास मरकळ रस्त्याने चऱ्होली मार्गे पालखी पुणे रस्त्यावर येऊन पुढे मार्गस्थ होणार आहे.