
अतिवेगावर नियंत्रणासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची नवी मोहीम
वडगाव-लोणावळ्यात स्पीड कॅमेरे
वेगमर्यादा न पाळल्यामुळे वाढली अपघातांची संख्या
वडगाव मावळ: महामार्गावर वेगमर्यादा न पाळल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) लेझर स्पीड कॅमेऱ्याचा वापर सुरू केला आहे. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ आणि लोणावळा येथील पोलिस ठाण्यांना पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या हस्ते लेझर स्पीड कॅमेरे सुपूर्द करण्यात आले.
जी.आर.एस.पी. व बी.आय.जी.आर.एस. या संस्थांच्या सहकार्याने पुणे ग्रामीण पोलिसांना हे कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, शंकर पाटील, संतोष जाधव, तसेच संस्थेच्या प्रमुख कांचन आवटे उपस्थित होते. लोणावळा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास कदम आणि वाहतूक पोलिस हवालदार चौधरी यांच्याकडे संबंधित कॅमेरे सुपूर्द करण्यात आले.
दोन वर्षांत ग्रामीण भागात ५७ प्राणघातक अपघात
मागील दोन वर्षांच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील प्राणघातक अपघातांपैकी ५७ अपघात ग्रामीण भागात नोंदवले गेले आहेत. अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे ग्रामीणमधील महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर या कॅमेऱ्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
रस्ते सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल
फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी अंतर्गत भागीदार असलेल्या ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत जुन्या मुंबई–पुणे महामार्गासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी स्पीड कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
पुणे ग्रामीण भागात अतिवेग हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत असून यात दुचाकीस्वार व पादचारी यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लेझर स्पीड कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अतिवेगावर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असून जनजागृती मोहिमेसह या उपक्रमामुळे अपघात व मृत्यूंची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे मत पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी व्यक्त केले.