
या प्रकल्पांच्या उभारणीसाठी राज्य शासनाने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल गडकरी यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पोलाद आणि सिमेंटवरील राज्य शासनाच्या हिश्श्याचा वस्तू व सेवा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, वाळू, खडी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील स्वामित्व धन माफ करण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रियेलाही शासनाने मोठे सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच या प्रकल्पांना अपेक्षित गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
रस्ते आणि पुलांच्या बांधकामात जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे श्री.गडकरी यांनी सांगितले. मलेशियामध्ये विकसित करण्यात आलेल्या ‘अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट काँक्रिट’ या तंत्रज्ञानामुळे पुलांतील दोन खांबांमधील अंतर ३० मीटरवरून १२० मीटरपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. त्यामुळे खर्चात बचत होण्याबरोबरच एकाच खांबावर रस्ता, पूल आणि मेट्रो अशी अत्याधुनिक रचना उभारता येणार आहे. पुलांची सुरक्षितता आणि गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी रबरी बेअरिंग्ज व एक्स्पान्शन जॉइंट्सच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, पुणे आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर या नव्या महामार्गामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी सुमारे ४० ते ४५ टक्के वाहतूक पुणे आणि मुंबईत प्रवेश करणार नाही. तसेच, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ऐतिहासिक स्वरूपाचे झाले असून, या मार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेल्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्यातील इतर महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांनाही गती देण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटर लांबीच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, भूसंपादन पूर्ण होताच कामाला सुरुवात केली जाईल. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे ते पुणे आणि पुढे शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडणाऱ्या सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.