
पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पवना धरणातून थेट बंद पाईपलाईन प्रकल्पाला तातडीने गती देण्याची मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. राहुल कलाटे यांनी १ एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला. यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्यांनी हा विषय गांभीर्याने उपस्थित करत प्रकल्पाच्या विलंबाकडे लक्ष वेधले होते.
पवना थेट बंद पाईपलाईन योजना ही शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रकल्पासाठी महापालिका अर्थसंकल्पात १८६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, एकूण खर्चाच्या किमान २५ टक्के निधीची उपलब्धता नसल्यास निविदा प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन प्रकल्प पुन्हा रखडण्याची शक्यता असल्याचे कलाटे यांनी नमूद केले आहे.
सध्या पवना धरणातून दररोज सुमारे ५०० दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरवठा केला जातो. नैसर्गिक प्रवाहाद्वारे रावेत बंधाऱ्यापर्यंत येणारे पाणी उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. काही प्रमाणात प्रदूषणामुळे पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे.
पवना बंद पाईपलाईन प्रकल्प पूर्ण झाल्यास अंदाजे १०० एमएलडी पाण्याची बचत होऊन तेवढे अतिरिक्त पाणी नागरिकांना उपलब्ध होऊ शकते. हा प्रकल्प मागील सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित असून, खर्चातही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला ३०० कोटी रुपयांचा अंदाज असलेला हा प्रकल्प तब्बल १२५६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित होणार
या योजनेअंतर्गत पवना धरणातून निगडी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे ३४.७१ किलोमीटर लांबीची भूमिगत बंद जलवाहिनी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी गळती रोखण्यासह स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे.
शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
“वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. टँकर व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पवना बंद पाईपलाईन प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरवासीयांना मोठा दिलासा मिळेल,” असे मत राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर मार्गी लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.