संग्रहित फोटो
वडगाव मावळ : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतात गॅस तुटवड्याच्या स्वरूपात दिसू लागला असून, त्याचा फटका थेट मावळ तालुक्यातील ग्रामीण भागाला बसत आहे. मुंबई–पुणे महामार्गालगत असलेल्या छोट्या चहाविक्रेत्यांपासून ते खाद्यपदार्थ विक्रेत्यांपर्यंत अनेक व्यवसायिकांना गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प असल्याने चायनीज फूड गाड्यांचे व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. अनेक विक्रेत्यांकडे गॅसचा साठा संपल्यामुळे सूप, नूडल्ससह विविध स्ट्रीट फूड पदार्थ तयार करणे अशक्य झाले आहे. दरम्यान, आपल्या समस्या मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नसल्याची खंत या छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकांनाच नव्हे, तर ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रोजच्या सवयीप्रमाणे चहा, नाश्ता किंवा फास्टफूड घेणाऱ्या नागरिकांना आता पर्याय शोधावे लागत आहेत. त्यामुळे छोट्या व्यवसायांबरोबरच स्थानिक अर्थचक्रावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
लाकूड, कोळशाचा वापर करण्याचा प्रयत्न
अनेक विक्रेत्यांनी सांगितले की, गॅस वितरकांकडून वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना महागड्या दराने सिलेंडर मिळवावे लागत आहेत. काही ठिकाणी तर काळाबाजाराचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे नुकसान अधिक वाढत आहे. यासोबतच, काही विक्रेत्यांनी पर्यायी उपाय म्हणून लाकूड किंवा कोळशाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यातून धूर आणि पर्यावरणीय समस्याही निर्माण होत आहेत. तसेच या पद्धतीत वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याने तो उपायही फारसा उपयोगी ठरत नाही.
गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. विशेषतः छोटे विक्रेते, हातगाडीधारक आणि फूड स्टॉल चालवणाऱ्यांसाठी स्वतंत्र पुरवठा यंत्रणा उभी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत कोणती ठोस भूमिका किंवा उपाययोजना जाहीर करण्यात आलेली नसल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर अनेकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






