
कृषी विभागाचा दणका; पुणे जिल्ह्यातील15 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
पुणे : पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे खत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी ही माहिती दिली.
निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दौंड तालुक्यातील सर्वाधिक ७ केंद्रांचा समावेश आहे. १ एप्रिलपासून जिल्हाभरात युरिया खताच्या साठ्याची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान सुमारे ३५०० टन युरियाचा साठा केवळ कागदावर (पॉस प्रणालीत) असल्याचे समोर आले, जो प्रत्यक्षात विक्री होऊनही प्रणालीतून कमी करण्यात आला नव्हता. यामुळे खताच्या पुरवठा नियोजनात अडथळा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुकानिहाय निलंबित कृषी सेवा केंद्रे
दौंड : अदिती कृषी सेवा केंद्र (लिंगाळी), बळीराजा ॲग्रो एजन्सी (देऊळगाव राजे), शिवकृपा ॲग्रो एजन्सी (पिंपळगाव), नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस (नंदादेवी), बिरोबा कृषी सेवा केंद्र (बिरोबावाडी), श्रीराम कृषी भंडार (हिंगणी बेर्डे), श्रीनाथ ॲग्रो सर्व्हिसेस (राहू).
इंदापूर : महेश फर्टिलायझर (आगोती नंबर १), गणेश ॲग्रो एजन्सी (कळस).
जुन्नर : विघ्नहर कृषी सेवा केंद्र (नारायणगाव), कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी (जुन्नर).
शिरूर : विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र (मांडवगण फराटा).
भोर : श्री भैरवनाथ शेती भांडार (वेळू).
आंबेगाव : शेतकरीराजा कृषी उद्योग (गावडेवाडी).
खत विक्रीवर बंदी, शेतकऱ्यांना आवाहन
ज्या १५ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्यांना निलंबन कालावधीत सर्व प्रकारच्या खतांची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी देखील या केंद्रांकडून खते खरेदी करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पॉस मशीनवर साठा अद्ययावत न ठेवणे आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत ठेवणे ही गंभीर बाब असून, यापुढेही अशी तपासणी मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.