
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेवर उतरणार पहिल्यांदाच हेलीकॉप्टर; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा
सासवड : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री शनिवारी (दि 11) पुरंदरला येत आहेत. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षनिमित्त विविध उपक्रमांची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान विमानतळ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खानवडी गावात उपक्रम असून, मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने येणार आहेत. हेलीकॉप्टर याच गावात उतरणार असल्याने याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
खानवडीतील जोती सावित्री इंटरनेशनल स्कूलचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते पार पडणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच जवळपास निम्मे मंत्रिमंडळ त्याचबरोबर राज्यमंत्री, राज्यातील खासदार, आमदार आणि संपूर्ण प्रशासन उपस्थित राहणार आहेत.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. १२८५ हेक्टर म्हणजे ३ हजार एकर क्षेत्रावर विमानतळ प्रकल्प उभारण्याचे जाहीर करून पहिल्या टप्प्यात ३००० एकर क्षेत्र संपादित करण्याचे निश्चित केले.
यास जवळपास ९४ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याचे सांगून प्रत्यक्ष जमीन मोजणीही पूर्ण झाली आहे. प्रकल्पासाठी एखतपुर २०१ हेक्टर, खानवडी २६६ हेक्टर, कुंभारवळण २५५ हेक्टर, मुंजवडी ७७ हेक्टर, पारगाव १८८ हेक्टर, उदाचीवाडी ४५ हेक्टर आणि वनपुरी १७५ हेक्टर याप्रमाणे एकूण तीन हजार एकर ( १२८५ हेक्टर ) याप्रमाणे क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक पार पडली असून एकरी किती भाव देणार ? शेतकऱ्यांचे पुनर्वसन कसे करणार ? असे प्रश्न सर्वत्र उपस्थित करण्यात येत आहेत.
विमानतळ प्रकल्प जाहीर केलेल्या गावात मुख्यमंत्र्यांसह इतर काही मंत्र्यांना घेऊन हेलीकॉप्टर याच खानवडी गावात उतरणार आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या इतिहासात प्रथमच खानवडी गावात हेलीकॉप्टर येणार असून, विमानतळ प्रकल्प होण्यापूर्वीच हेलीकॉप्टर उतरणार असल्याने याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा प्रकल्पाला अद्यापही विरोध असल्याने विरोध आज दिसणार का ? मुख्यमंत्री विमानतळ प्रकल्पाबाबत काय घोषणा करणार ? शेतकऱ्यांना परतावा आणि एकरी भाव जाहीर करणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.