
स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा...; शिरुरमध्ये वीज ग्राहक संघटनेचा इशारा
शिरूर : स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात तसेच वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ शिरूर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. स्मार्ट मीटर बंदी झाली पाहिजे, स्मार्ट मीटर सक्ती कोणासाठी , एमएसईबी मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चाची सुरुवात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या मोर्चात वीज ग्राहक संघटनेचे प्रवीण गायकवाड, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, माधव सेनेचे रविंद्र सानप, मनसेचे महिबूब सय्यद, रवींद्र लेंडे, स्वप्नील माळवे, प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, वैशाली चव्हाण, मयूर फुलफगर, प्रवीण मुथा, बंटी जोगदंड, ललिता पोळ, छाया पटवेकरी, प्रितेश फुलडाळे, संदीप कडेकर, सुजित मैड, निलेश पाठक, निलेश कोळपकर, शैलेश जाधव, महेंद्र वारे, सुनील बाफना, भानुदास वांजुळ, रमणलाल भंडारी, प्रवीण वराळे, मृणाल बाफना, संजय ढमढेरे, अशोक सुराणा, रोहित काळे, रियाज सय्यद, राहुल शिंदे, तुषार भवाळ, दादाभाऊ लोखंडे, शेख अब्दुल हमीद, निळकंठ देवळालीकर, सुरेश शर्मा, रविंद्र कर्डिले आदी उपस्थित होते.
मोर्चादरम्यान वीज ग्राहक संघटनेचे प्रवीण गायकवाड म्हणाले की, शिरूर शहरात स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. स्मार्ट मीटर बसवणे शिरूर शहरात तातडीने बंद करावे. स्मार्ट मीटर सक्तीने बसवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याचबरोबर या आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी दिनांक 21 जून रोजी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर प्रवासी संघटनेचे अनिल बांडे म्हणाले, “स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने रद्द करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे.” रविंद्र (बापू) सानप यांनीही स्मार्ट मीटर योजनेवर टीका करत, “कोणाचे घर भरण्यासाठी सामान्य नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नका,” अशी मागणी केली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी अमोल बारवकर यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, शिरूर शहरात सुमारे २८ हजार वीज मीटर असून, आतापर्यंत १३ हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महावितरणकडून नव्हे तर नियुक्त एजन्सीमार्फत केले जात आहे. नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात दिलेले निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. तसेच स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय हा शासनस्तरावरील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटरच्या प्रश्नावरून शिरूरमध्ये नागरिकांमध्ये वाढत असलेली नाराजी या मोर्चातून पुन्हा एकदा समोर आली असून, पुढील काळात या विषयावर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.