
जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कदमवाकवस्ती : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा–मुठा नदीच्या पात्रात सध्या जलपर्णी (पाणवनस्पती) मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. नदीचे पाणी दूषित होत असून जलचर प्राण्यांचा श्वास गुदमरू लागला आहे. परिणामी विविध प्रजातींचे मासे आणि इतर जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा मोठा फटका नदीकाठच्या गावांतील छोट्या-मोठ्या मच्छीमार व्यवसायिकांना बसत आहे.
हवेली तालुक्यातील मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कोलवडी, अष्टापूर, भवरापूर आदी गावांलगतच्या नदीपात्रात जलपर्णीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. त्यामुळे नदीचे पात्र पूर्णपणे हिरवेगार झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी जलपर्णी सडून दुर्गंधी पसरली असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जलपर्णीमुळे हजारो मासे व इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नदीकाठच्या गावांमध्ये शेतीसाठी सुरू असलेल्या लिफ्ट पाणीपुरवठा योजनांनाही याचा मोठा फटका बसत आहे.
जलपर्णी मोठ्या प्रमाणावर जमा झाल्याने पाणी उपसा यंत्रणा अडथळली असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नदीपात्रातील या बदलामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूपही बिघडत चालले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड व चाकण एमआयडीसी परिसरातील काही उद्योगांमधून सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी तसेच पुणे शहरातील मलजल थेट नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
डासांची वाढ होऊन विविध आजारांचा धोका वाढला
पूर्वी या नदीवरून अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या; मात्र आता पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने नागरिकांना बोअरवेल व विहिरींच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. काही गावांमध्ये तर पाणी विकत घ्यावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामात नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कांदा, ऊस, ज्वारी, बटाटा, गहू, मका, पालेभाज्या आदी पिकांचे उत्पादन घेतले आहे. मात्र दूषित नदीपाणी पिकांना देताना शेतकऱ्यांच्या हात-पायांना खाज येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच परिसरात डासांची वाढ होऊन विविध आजारांचा धोका वाढला आहे.
व्यापक मोहीम राबविण्याची गरज
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून दरवर्षी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जात असले; तरी अपुरी यंत्रणा आणि सतत वाढणारे प्रदूषण यामुळे समस्या कायम आहे. नदीलगतच्या अनेक गावांमधून ओला-सुका कचरा, प्लास्टिक व बांधकामाचा राडारोडा नदीत टाकला जात असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी व्यापक मोहीम राबवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नदी स्वच्छता अभियान, नदी बचाव मोहीम आणि लोकसहभागातूनच मुळा-मुठा नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा मार्ग निघू शकतो. अन्यथा विषारी प्रवाह बनलेली ही नदी भविष्यात नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.