
देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत; आषाढी वारीपूर्वी पर्यावरणीय संकट
वडगाव मावळ/ सतिश गाडे : संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी असलेल्या देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात गेल्या दोन दिवसांपासून हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना घडलेल्या या प्रकारामुळे वारकरी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे तरंगताना दिसत असून, अनेक मासे नदीकिनारी वाहून आले आहेत. काही मासे तडफडत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार नदीतील वाढलेली जलपर्णी, विविध ठिकाणांहून होणारा रासायनिक व सांडपाण्याचा विसर्ग तसेच पाण्याची घटलेली पातळी यामुळे विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असावे. परिणामी मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, देहू परिसरातील अनेक गृहसंकुलांचे सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन काळवंडले आहे. या घटनेमुळे इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरवर्षी आषाढी वारीसाठी लाखो वारकरी देहूनगरीत दाखल होत असतात. परंपरेनुसार अनेक भाविक इंद्रायणी नदीत स्नान करतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून हे पाणी सुरक्षित आहे का, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
या घटनेची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मत्स्य व्यवसाय विभाग आणि जलसंपदा विभाग यांनी संयुक्त तपासणी करावी, पाण्याचे नमुने तपासावेत आणि प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आषाढी वारी तोंडावर; प्रशासनाची मोठी परीक्षा
आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना इंद्रायणी नदीतील हजारो माशांच्या मृत्यूच्या घटनेने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहूत दाखल होतात. श्रद्धेने अनेक वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून दर्शन घेतात. मात्र नदीतील वाढते प्रदूषण, काळवंडलेले पाणी आणि मृत माशांचा खच यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
देहू ही संत तुकाराम महाराजांच्या विचारांची आणि वारकरी परंपरेची पवित्र भूमी मानली जाते. अशा पवित्र इंद्रायणी नदीची झालेली दुरवस्था वारकरी संप्रदायासाठी अत्यंत वेदनादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे. नदीपात्रातील जलपर्णी, सांडपाण्याचा अनियंत्रित विसर्ग आणि वाढते प्रदूषण यामुळे इंद्रायणीचे अस्तित्वच धोक्यात आले असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता तपासणी, मृत माशांची तातडीने विल्हेवाट आणि प्रदूषण नियंत्रणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.