
पुणे जिल्हा परिषदेत आंबेगावला पुन्हा मान; वळसे पाटील कुटुंबाच वर्चस्व पुन्हा सिद्ध
आंबेगाव तालुक्याच्या राजकीय इतिहासात वळसे पाटील कुटुंबाचे स्थान महत्त्वपूर्ण राहिले आहे. तब्बल ४७ वर्षांपूर्वी, सन १९७९ मध्ये माजी आमदार व माजी जिल्हा परिषद सदस्य (स्व.) दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांची पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतीपदी निवड झाली होती. त्या काळात त्यांनी केलेले काम आजही आदर्श मानले जाते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे नातू विवेक वळसे पाटील यांनी आजच्या पिढीत नेतृत्वाची परंपरा पुढे नेली आहे. विशेष म्हणजे, त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची संधी मिळणे ही आंबेगावच्या राजकीय प्रभावाचीच साक्ष ठरत आहे.
यंदाच्या निवड प्रक्रियेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या राजकीय रणनीतीचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठबळाचा मोठा प्रभाव दिसून आला. या दोघांच्या समन्वयातून आंबेगाव तालुक्याला पुन्हा झुकते, माप मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री (स्व.) अजित पवार यांच्या काळापासून बारामती-आंबेगाव यांच्यातील राजकीय व विकासात्मक नाते पुन्हा अधोरेखित झाले असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
पुणे जिल्हा परिषदेत आंबेगाव तालुक्याला नेहमीच महत्त्वाचे स्थान मिळत आले आहे. १९९२ आणि १९९७ मध्ये सुभाष मुरमारे यांनी समाजकल्याण सभापतीपद भूषवले होते. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या नेतृत्वातून जिल्हा परिषदेत विविध पदांवर आंबेगावचा ठसा उमटवला. शैलजा ढोबळे (१९९८-९९) यांना अध्यक्षपदी, तर अरुण गिरे यांना उपाध्यक्षपदी संधी मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. २००७ ते २००९ या कालावधीत अरुण गिरे यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. या सर्व घडामोडींचा आढावा घेतला असता, आंबेगावचा जिल्हा परिषदेमधील प्रभाव हा अपघाती नसून सातत्यपूर्ण राजकीय नियोजनाचा परिणाम असल्याचे स्पष्ट होते. या निवडीचे औचित्य साधून मंचर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात विवेक वळसे पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘विवेकदादा वळसे पाटील यांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जबाबदारी वाढल्याची जाणीव
सत्काराला उत्तर देताना विवेक वळसे पाटील यांनी अत्यंत संयत शब्दांत भावना व्यक्त केल्या. “हा सन्मान माझा नसून आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवत युवक व महिलांसाठी ठोस कार्यक्रम राबवले जातील. तसेच, हा सन्मान प्रेरणादायी असून, पुढील काळात कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी वाढल्याची जाणीव त्यांनी व्यक्त केली.
गावोगावच्या विकासाला गती देणार
या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विवेक वळसे पाटील यांना शुभेच्छा देताना त्यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनीही या प्रसंगी बोलताना विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक वळसे पाटील समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गावोगावच्या विकासाला गती देतील,” असे त्यांनी नमूद केले.
हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड शहराचा होणार कायापालट; रस्ते रुंदीकरण, मेट्रो मार्गाचे सुशोभीकरण अन्…
अधिक वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करेल
एकूणच, पुणे जिल्हा परिषदेत आंबेगाव तालुक्याला मिळालेला हा मान केवळ राजकीय यश नसून, विकासाच्या नव्या पर्वाची नांदी मानली जात आहे. वळसे पाटील कुटुंबाची परंपरा, नेतृत्वाची सातत्यता आणि प्रभावी राजकीय रणनीती यांच्या बळावर आंबेगाव तालुका पुढील काळात अधिक वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.