
वडज धरणातून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू; मीना नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नारायणगाव : कुकडी धरण प्रकल्पातील धरणांपैकी जुन्नर तालुक्यातील वडज धरणातील पाणीसाठा वाढल्याने धरण प्रशासनाने सांडव्यावरून 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
वडज धरणाची पाणीपातळी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७१५.६१ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गात परिस्थितीनुसार वाढ अथवा घट करण्यात येऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मीना नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीत सायरन वाजवून नागरिकांना सावध करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये
मीना नदी परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीतील पाण्याचे पंप, शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारे, साहित्य तसेच जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असेही प्रशासनाने म्हटले आहे. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी व कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे
नदीकाठच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी व जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू मुसळधार पावसाचा फटका आता तेथील नागरिकांना बसत आहे. सोमवारी व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.
विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
मंदिराच्या चारही बाजूने पाण्याचा वेढा पडल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नव्याने उभारण्यात आलेल्या सभा मंडपातही पावसाचे पाणी गळू लागल्याने विकासकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.