
ओतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ; उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, टोमॅटो-मिरची पिके संकटात
ओतूर : ओतूर आणि पंचक्रोशीतील परिसरात यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेकडो फूट खोल गेलेल्या बोअरवेल आणि विहिरींनी तळ गाठल्याने भाजीपाला पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. ऐन हंगामात लाखो रुपये खर्च करून लागवड केलेल्या टोमॅटो, मिरचीसह विविध भाजीपाला पिकांना पाण्याअभावी करपण्याची वेळ आली आहे. शेतकरी आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडले आहेत.
ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, अहिनवेवाडी, पाचघर परिसर हा भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि उसनवारी करून पिकांची लागवड केली. मात्र, एप्रिल-मेपासून तापमानाचा पारा सातत्याने चाळिशीपार गेल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने घसरली. परिणामी, परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून, अनेक बोअरवेलने पाणी देणे बंद केले आहे.
काही ठिकाणी बोअरवेलमधून अवघा अर्धा ते एक तासच पाणी मिळत असल्याने पिकांना पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे टोमॅटो आणि मिरची पिकांची पाने कोमेजत असून, फुलगळ वाढली आहे. लागलेली फळेही डागाळण्यास सुरुवात झाली आहे.
पाणीटंचाईमुळे उत्पादन घटण्याची भीती
पिके वाचवण्यासाठी अनेक शेतकरी रात्री-अपरात्री वीज उपलब्ध होताच विहिरीवर धाव घेत आहेत. मात्र, विहिरींमध्ये पाणी नसल्याने वीज असूनही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी उभी पिके वाचवण्यासाठी खासगी टँकरचा आधार घेतला असला, तरी हजारो रुपयांचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी पिके उपटून टाकण्याची वेळ आली आहे.
बियाणे, खते, औषध फवारणी आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतीचा उत्पादन खर्च आधीच वाढला असताना पाणीटंचाईमुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. बाजारात भाजीपाल्याला चांगला दर मिळत असला, तरी पिकेच हातची जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण
दरम्यान, चिल्हेवाडी धरण आणि मांडवी नदी परिसरात असूनही ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, अहिनवेवाडी व पाचघर भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बाधित पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी तसेच शेतीसाठी दिवसा सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.कडक उन्हाळ्याने यंदा ओतूर परिसरातील शेतकऱ्यांची कठीण परीक्षा घेतली असून, आता वरुणराजा कधी बरसणार याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत.
“एकरी लाखो रुपये खर्च करून टोमॅटो व मिरचीची लागवड केली. सध्या पिके तोडणीच्या टप्प्यात असताना पाण्याअभावी झाडे डोळ्यांसमोर जळताना पाहावी लागत आहेत.
– शेखर डुंबरे, प्रगतशील शेतकरी, ओतूर