
Punegaon dam desilting project,
राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येत असलेली ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेती विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे, असा विश्वास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केला. दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. Nashik News
सध्या संजीवनी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुणेगाव धरणात युद्धपातळीवर काम सुरू आहे. या
पाहणी दौऱ्यात उपअभियंता प्रदीप लोधे, माळेदुमालाचे सरपंच केदू वाघ, रवि काकड, सागर गायकवाड, अमोल काकड, कीर्ती जायभाये आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
धरणातील साचलेला गाळ काढल्यामुळे आगामी पावसाळ्यात अधिक पाणी साठवता येईल, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.
शेतकऱ्यांना दुहेरी लाभः धरणातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. यासोबतच, शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे.
जमिनीची सुपीकता वाढणारः या सुपीक गाळामुळे जमिनीचा पोत सुधारेल आणि पीक उत्पादनात सकारात्मक बदल घडून येईल.
नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या या व्यापक मोहिमेमुळे तब्बल ७२८ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा नव्याने निर्माण होणार आहे.
यासोबतच धरणातील या सुपीक गाळामुळे तब्बल ७,२८० हेक्टर शेतजमीन सुपीक होण्यास मोठी मदत मिळणार आहे.