कांद्याला प्रतिक्विंटल २,००० रुपये अनुदान देण्याची उत्पादकांची मागणी (संग्रहित फोटो)
लासलगाव : जिल्ह्यासह निफाड तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून वाढलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. शेतात उभ्या असलेल्या तसेच काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाढत्या तापमानामुळे कांद्याची फुगवण थांबल्याने उत्पादनात घट झाली असून, काढणीनंतर गंजी करून ठेवलेला कांदाही खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात बुधवारी ३८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या दीड महिन्यात तालुक्यात तब्बल २६ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम राहिल्याने उष्णतेचा तीव्र परिणाम शेती पिकांवर दिसून येत आहे. विशेषतः उन्हाळी कांद्याच्या पिकावर याचा मोठा परिणाम झाला असून, कांद्याची योग्य वाढ व फुगवण न झाल्याने वजनात मोठी घट झाली आहे.
दर कोसळले; उत्पादन खर्चही निघेना
शेतकरी कांदा काढणीनंतर पातीखाली झाकून गंजी करून साठवण करत असतात. मात्र, यंदा वाढत्या उष्णतेमुळे साठवणीत ठेवलेला कांदा सडू लागला असून, मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे आधीच बाजारभाव घसरलेले असताना उत्पादन खर्च तर दूरच, वाहतूक आणि मजुरीचा खर्च निघेल का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
वाढत्या उष्णतेने फुगवण; वजन घटले, कांदाही सडला
ब्राम्हणगाव (विंचूर) येथील कांदा उत्पादक शेतकरी संपत कारभारी जाधव यांनी दोन एकर क्षेत्रात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. मात्र, अतिउष्णतेमुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. कांद्याची फुगवण थांबल्याने वजन घटले, तर काढणीनंतर शेतात ठेवलेला कांदाही खराब होऊ लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. आता पावसाळा जवळ आल्याने नवीन पिकांच्या लागवडीसाठी तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल किमान १५०० ते २००० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संपत जाधव यांनी केली आहे.
मध्यपूर्वेतील युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका; सरासरी 1051 रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर






