विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (फोटो -ani)
मुंबई: काल महाराष्ट्र विधानसभेच्या विधिमंडळ परिसरात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर लोकशाहीच्या मंदिरातच असा राडा झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत कालच्या घटनेबद्दल खेड व्यक्त केला आहे. दरम्यान आता या घटनेची गंभीर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली असून, कडक कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित असलेले कार्यक्रत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करत असल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करण्याच्या सूचना नार्वेकर यांनी केल्या आहेत. ज्या कार्यकर्त्यांवर फौजदारी दाखल केली जाणार आहे त्यांची चौकशी करून विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे वर्ग करत असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. यादरम्यान पोलीसांकडून नितीन देशमुख यांना अटक करण्यापूर्वीच जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर बसले आणि त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली. नितीन देशमुख यांना विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
गुरुवारी महाराष्ट्र विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. बुधवारी आव्हाड आणि पडळकर यांच्यात जोरदार राडा झाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनेचा अहवाल मागवला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारतीच्या तळमजल्यावरील लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर काही काळ परिस्थिती बिघडली परंतु तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी दोन्ही गटांना वेगळे केले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गटातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
विधिमंडळातील राड्यावर पडळकरांची पहिली प्रतिक्रिया
विधानसभेच्या परिसरात जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. विधानसभेचा सदस्य म्हणून मला याचे अतीव दुःख आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती यांची दिलगिरी व्यक्त करतो. याविषयी आमच्या नेते मंडळींशी चर्चा करून सविस्तर बोलतो.