
Alibag News: तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार, तरी एसटी बस चिखलाने माखलेल्या; ‘नोटेड’ च्या पलीकडे कारवाई कधी? प्रवाशांचा संताप
Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
अलिबाग-शेगाव मार्गावरील सकाळच्या बसच्या स्वच्छतेबाबत तक्रार करताना संबंधित बसच्या काचा अजिबात स्वच्छ केल्या जात नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. ३० जुलै रोजी धावलेल्या अलिबाग-शेगाव बसचे छायाचित्र व व्हिडिओ अधिकाऱ्यांना पाठवून ‘गाडी वॉशिंग केलेली आहे का?’ असा थेट सवाल करण्यात आला. बसच्या काचा चिखलाने इतक्या माखलेल्या होत्या की, त्यातून बाहेरील रस्ता व परिसर स्पष्ट दिसत नसल्याचे व्हिडिओतून निदर्शनास येते. त्यामुळे प्रवाशांना अस्वच्छतेचा त्रास तर होतोच, शिवाय चालकाच्या दृश्यतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या चिखलाचे पाणी बसच्या चाकांमुळे उडून खिडक्यांवर येते. विशेषतः नवीन BS-6 बसमध्ये पुढील टायरमधून उडणारा काळा चिखल मागील खिडक्यांवर येत असून, काही वेळा खिडकी उघडी असताना तो थेट प्रवाशांच्या अंगावर उडतो, अशी तक्रार करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे कपडे खराब होत असून, स्वच्छता अधिभार घेऊनही प्रवाशांना अस्वच्छ बसमधून प्रवास करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांकडून तिकिटामागे ₹२ स्वच्छता अधिभार घेतला जातो. मग हा अधिभार नेमका कुठे खर्च केला जातो, असा सवाल रायगड एसटी प्रेमी संघटनेने केला आहे. बसची नियमित धुलाई, काचा स्वच्छ करणे, सीट व आतील भागाची स्वच्छता करणे यासाठी व्यवस्था असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसेल तर स्वच्छता अधिभाराचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
रायगड एसटी प्रेमी संघटनेतर्फे मागील महिनाभरापासून अलिबाग आगार व्यवस्थापक आणि रायगड विभाग नियंत्रकांकडे बसच्या स्वच्छतेबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. बसच्या अवस्थेचे फोटो आणि व्हिडिओही संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. मात्र, तक्रारीवर ‘नोटेड’ असे उत्तर दिल्यानंतर प्रत्यक्षात काय कारवाई झाली, याबाबत स्पष्टता नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. एका तक्रारीनंतर संबंधित कंपनीला दंड करण्याचा पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. तसेच बस धुण्याच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचेही कारण पुढे करण्यात आले. मात्र, मनुष्यबळाचा अभाव किंवा संबंधित कंपनीची अडचण याचा फटका प्रवाशांनी का सहन करावा? असा सवाल संघटनेने केला आहे.
अलिबाग-शेगाव मार्गावरील बससेवेच्या संदर्भात शेगाव संस्थानमधील स्वच्छतेच्या काटेकोर व्यवस्थेचाही दाखला देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक येत असलेल्या शेगावसारख्या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे एसटीसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार घेतला जात असल्याने स्वच्छ, नीटनेटकी आणि सुरक्षित बस उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.
रायगड एसटी प्रेमी संघटनेचे समीर रांजणकर यांनी या प्रकाराकडे रायगड विभाग नियंत्रकांचे लक्ष वेधले आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे फोटो-व्हिडिओ पाठवून तक्रारी करूनही केवळ ‘नोटेड’ करून विषय संपवू नये, तर संबंधित ठेकेदार किंवा कंपनीवर नियमानुसार कारवाई करून बसच्या स्वच्छतेची नियमित तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
‘फक्त नोटेड करत राहणार की त्याची अंमलबजावणीही करणार?’ असा सवाल करत रांजणकर यांनी एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रवाशांकडून स्वच्छतेच्या नावाखाली घेतला जाणारा प्रत्येक दोन रुपयांचा हिशेब आणि त्यातून मिळणाऱ्या सुविधांचा जाब एसटी प्रशासनाने द्यावा, तसेच अलिबाग आगारातील सर्व बसची अचानक तपासणी करून स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या संबंधित कंपनीवर आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी रायगड एसटी प्रेमी संघटनेने केली आहे.