
कर्जतमध्ये 'परिवर्तन आघाडी'चा मोठा विजय!
कर्जत परिवर्तन आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या रॅलीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना घारे म्हणाले, “आगामी काळात ही आघाडी संपूर्ण तालुक्यात आगेकूच करेल. कर्जत तालुक्याला भयमुक्त करून दंडेलशाहीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनीही जनतेचे आभार मानत भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन कर्जत परिवर्तन आघाडी स्थापन केली आणि जनतेचा विश्वास संपादन केला. आज संपूर्ण तालुक्याने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. हा विजय म्हणजे आम्ही एकत्र येऊन दाखवलेल्या ताकदीचे फलित आहे.”
नितीन सावंत पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट आणि प्रामाणिक मेहनत यामुळेच विरोधकांचा ‘व्हाईट वॉश’ करणे शक्य झाले. हातात हात घालून केलेल्या कामामुळे विरोधकांचा संपूर्णपणे सुपडा साफ झाला आहे.”
आगामी काळात कर्जत आणि खालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू आणि जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करू, असे आश्वासन विजयी उमेदवारांच्या वतीने देण्यात आले. “आम्ही संपलो, असे म्हणणाऱ्यांना जनतेनेच उत्तर दिले आहे. खरी शिवसेना कोणती आणि जनतेचा कौल कोणाच्या पाठीशी आहे, हे आज स्पष्टपणे दिसून आले आहे,” असे ठाम मत सावंत यांनी व्यक्त केले.