
कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील ताकई परिसरातील मित्रांचा एक गट साजगावमार्गे माथेरानकडे जात होता. त्याचवेळी पळसदरी येथील अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या रोहित वाघमारे यांच्या दुचाकीची वॅगनार कारशी समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील अंबरनाथ येथील सोनाली या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर श्री स्वामी समर्थ मठाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे हलविण्यात आले.
या अपघातानंतर स्थानिकांनी एमएसआरडीसीच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्जत-खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट असून काही भागात अचानक रस्त्याची रुंदी कमी होते. याशिवाय इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स आणि रस्ते चिन्हांचा अभाव असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भूसंपादन प्रक्रियेत विलंब आणि शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून मोबदला न मिळाल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे हा महामार्ग अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून तो वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
या मार्गावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे “पळसदरीचा अर्धवट रस्ता आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.