
Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे सुशोभीकरण करा; महाबळेश्वर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
आता ग्रामीण भागाप्रमाणेच मुरुड शहराला सुद्धा पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. सुमारे १२ हजारच्या आसपास असणाऱ्या लोकसंख्या मुबलक पाणी मिळत नसल्याने येथील लोक सुद्धा त्रस्त झाले आहेत. मुरुड शहराला आंबोली धरणातून पाणी पुरवठा होत असतो. सध्या तरी आंबोली धरणात मुबलक पाणी आहे. परंतु या भागात असणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मुरुड नगरपरिषदेस पाणी पुरवठा करणे जिक्रीचे बनले आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी या भागात विजेचे सातत्य टिकून राहणे खुप आवश्यक आहे.
वीज व्यवस्थित व टिकून राहिली तर मोठ्या पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असते. परंतु वीज गेली तर छोट्या पंपद्वारे पाणी पुरवठा कमी प्रमाणात होऊन याची झळ नळ ग्राहक यांना सहन करावी लागत आहे. सध्या मुरुड शहरात एक तास पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे १२ हजार लोकसंख्येस हा पाणी पुरवठा खूपच अल्प असा आहे. मुरुड शहर हे पर्यटन स्थळ असून येथे असंख्य हॉटेल व लॉजेस आहेत.
शनिवार व रविवार येथे पर्यटक संख्या खूप मोठी असते. अशा वाढत्या लोकसंख्येस फक्त १ तास पाणी पुरवठा होत असल्यामुळे बिकट अवस्था निर्माण झाली आहे. मुरुड शहरातील काही भागात तर अर्धा तास पाणी दिले जात आहे. मुरुड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आंबोली धरणात अबाधितपणे वीज पुरवठा होत राहिला तर मुरुड शहरात चांगला पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. याबाबत दै. ‘नवराष्ट्र’च्या प्रतिनिधीने मुरुड महावितरणच्या उप कार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांना विचारणा केली असता, प्रतिक्रिया देताना सूर्यवंशी यांनी सांगितले की, “मुरुड नगरपरिषदेने रस्त्यावरील पथदिवे व आंबोली धरणाला पाणी पुरवठा करणारी विद्युत यंत्रणेचे लाखो रुपये थकीत ठेवले आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून आमच्यावर सतत दबाव येत असून पैसे भरणे खूप आवश्यक आहे. त्यांनी लवकरात लवकर पैसे भरले तर विजेमध्ये सातत्य ठेवण्याची जबाबदारी आमची असेल, नगरपरिषदेने थकीत रक्कमेचा भरणा लवकरात लवकर करावा वीज पुरवठा नियमित होईल”, असे त्यांनी सांगितले.