
दरम्यान, शहरातील श्री पंचमुखी मारुती मंदिर येथे सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ नगरपंचायत कार्यालयात धाव घेतली. तेथून ‘फायर बुलेट’ घेऊन ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याच्या कामाला गती मिळाली.यावेळी धोपट पाणीवाले, संदीप दिनेश नायक, नितीन शिंदे, अपी मोरे यांसह स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत पाण्याची तातडीने व्यवस्था केली. बादल्या, पाण्याच्या टाक्या व उपलब्ध साधनांचा वापर करून नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
बाजारपेठेतील नागरिक, व्यापारी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेत एकजुटीने मदतकार्य केल्यामुळे अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग वेळीच नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा संपूर्ण बाजारपेठ धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही दुकानांचे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर शहरात सुसज्ज अग्निशामक यंत्रणा उभारण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
याआधी देखील खेड तालुक्यातील एका हॉटेलला अशीच आग लागली होती.खाडीपट्टा परिसरातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झालं. या दुर्घटनेत संबंधित व्यावसायिकाचे सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगितलं गेलं. मिळालेल्या माहितीनुसार,स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तात्काळ जलाल राजपुरकर यांना फोनद्वारे माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
संबंधित मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वणवा लागल्याचे आढळून आले नाही. ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. काही महिन्यांपूर्वी याच हॉटेलच्या आवारात काही व्यक्ती अवैधरित्या प्रवेश करून मद्यप्राशन करत असल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्या वेळी जलाल राजपुरकर यांनी संबंधितांना पकडले असता त्यांच्याकडून धमकी देण्याचा तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आणि आता घडलेली ही दुर्घटना यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.