
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या २४६ गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान, सामान्य अनरक्षित डबे असलेल्या १८४ मिश्र विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. याशिवाय ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ६२ पूर्णतः अनरक्षित मेमू विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९८ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६ फेऱ्या आणि पुणे येथून १० फेऱ्या चालविल्या जातील.
यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, लाखो चाकरमानी त्यापूर्वी आठ दिवस कोकणात गावी दाखल होतील. त्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले आहे. रेल्वे, एसटीचे आरक्षण केले जात आहे. अतिरिक्त तिकीट खिडक्यांची व्यवस्था करून प्रवाशांची गैरसोय टाळण्यावर भर देण्यात आला आहे.
२६ जुलैपासून सीएसएमटी-मंगळूरू एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन- तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाड्या सावंतवाडी रोड येथे थांबण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त सीएसएमटी-सावंतवाडी, एलटीटी- सावंतवाडी, दिवा-खेड मेमू, दिवा- चिपळूण आणि पुणे-रत्नागिरी या विशेष गाड्या विविध तारखांमध्ये चालवण्यात येणार आहेत.
एलटीटी-मडगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी मार्गावर साप्ताहिक तसेच द्विसाप्ताहिक विशेष फेऱ्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार असून, गर्दीचे नियोजनही अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
कोकण क्षेत्रातील रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रेल्वे मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन प्रमुख गाड्यांना थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निर्णयाची माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २५ मार्च २०२४ रोजी केलेल्या विनंतीनंतर, जनहितार्थ या थांब्यांना मंजुरी देण्यात आली आहे.