
या धडक मोहिमेचा जबरदस्त धसका जिल्ह्यातील भेसळखोरांनी घेतला असून, आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया होणार असल्याची कुजबुज सुरू झाल्याने अनेक जण एफडीएच्या रडारवर आहेत. त्यामुळे नियमबाह्य काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी
सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न प्रशासनाच्या पथकाने मार्चपासून जिल्ह्यात तब्बल १५१ ठिकाणी अचानक धाडी घातल्या आहेत. या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे समोर आले. प्रशासनाने अस्वच्छता बाळगणाऱ्या आणि नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३२ आस्थापनांना तातडीने सुधारणा नोटीस बजावली आहे. याशिवाय, नियमांचे थेट उल्लंघन करणाऱ्या १५ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत एकूण ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील एका प्रसिद्ध बिर्याणी सेंटरचाही समावेश असून अस्वच्छतेमुळे त्याच्यावर १३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अन्न प्रशासनाने जिल्ह्यातील मिठाई व्यावसायिकांसाठी अत्यंत कडक नियमावली लागू केली आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट चालकांना विक्रीसाठी ठेवलेल्या प्रत्येक मिठाईच्या डब्यावर किंवा ट्रेवर उत्पादन तारीख आणि एक्सपायरी तारीख दर्शवणारे लेबल लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.
या नियमाचे उल्लंघन झाल्यास कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. केवळ अन्नपदार्थच नव्हे, तर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीवरही प्रशासनाने जोरदार प्रहार केला आहे. अन्न प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रशासनाने शालेय पोषण आहाराबाबतही कडक भूमिका घेतली आहे. शाळांमध्ये पोषण आहार तयार करताना २०२० च्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.