
पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६१ वरील रघुवीर घाटात साखळी क्रमांक १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याचा कडा तुटला आहे. तसेच १००/५०० ते १०५/५०० किलोमीटर या पट्ट्यात डांबरी रस्ता आणि साईडपट्टी खचली असून अनेक ठिकाणी माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. रस्त्याला तडे गेल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग
पावसाळ्यात रघुवीर घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात. मात्र, सध्याची धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन घाटातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांना थांबण्यास तसेच खासगी वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या जड वाहनांनाही या मार्गावरून वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
प्रशासनाने अत्यावश्यक सेवांचा विचार करून अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेला आवश्यकतेनुसार परवानगी दिली आहे. मात्र, या वाहनांनाही अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात डोंगरभागात दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढलेला असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रघुवीर घाट हा कोकणातील लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक असला तरी मानवी जीविताचे संरक्षण आणि नैसर्गिक आपत्ती टाळणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १० ऑगस्टपर्यंत पर्यटकांनी रघुवीर घाटात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले