
हवामान बदलाचा मोहोरावर झाला विपरित परिणाम
उत्पादनात घट होण्याची शक्यता
मोहरात संयुक्तिक फुलांचे प्रमाण कमी
मंडणगड: यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्यानंतर वाढलेला थंडीचा हंगाम, या बदलेल्या हवामानाचा आंब्याच्या मोहरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी, मोठ्या अपेक्षेने बहरलेला मोहर काळवंडून गळून पडल्याचे अनेक ठिकाणी आढळून आल्याने आंब्याला फळ धारणा होण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. त्यामुळे (Ratnagiri) मंडणगड तालुक्यातील आंबा बागायतदार चिंतातूर अवस्थेत आहेत.
हे दृष्य केवळ कमी अधिक प्रमाणात कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसते. खरं तर यंदाच्या मोसमात सुरवातीस आंब्याला अतिशय चांगला मोहर बहरल्याचे दिसले. त्यामानाणे आंब्याचे चांगले पिक येण्याची अधिक अपेक्षा असताना आंब्याचा मोहरच खराब झाल्याने बागायतदारांच्या पदरी निराशा पडली आहे.
या नैसर्गिक संकटाने आंबा बागायतदार पूर्णपणे हवालदिल आहेत. तर सरकारने यावर सकारात्मकपणे विचार करून बागायतदारांना नुकसान भरपाई देवून दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकंदरीत, हापूसवर आलेले हे नैसर्गिक संकट कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी आढळून आले आहे, शिवाय ज्या ठिकाणी आंब्याचा मोहर सुस्थितीत आहे, फळधारणा झाली आहे, त्याठिकाणीसुद्धा आब्याचा हगाम लावण्याची शक्यात वर्तवण्यात येत असल्याने आंब्याला योग्य दर मिळण्याची शक्यता कमी असल्याची भीतीही व्यक्त केली जाते. मंडणगड तालुक्यातील बागायतदारांनी यासंदर्भात फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी यावर सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका मंत्री गोगावले यांनी यावेळी सागितले.
थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका; कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी
मोहरात संयुक्तिक फुलांचे प्रमाण कमी
या संदर्भात मंडणगडचे तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर यांच्याशी चर्चा केली असता, यंदाच्या उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे नियमित असलेला थंडीचाही हंगाम लांबला. वातावरणातील या अचानक बदलाचा परिणाम आंब्याच्या मोहरावर झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. बदलेल्या हवामानामुळे आंब्याच्या मोहरामध्ये प्रचंड वाढ झालेली असली तरी मोहरात संयुक्तिक फुलांचे प्रमाण कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात मोहोर सुकून गेला. परिणामी फळधारणा होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Alphonso Mango: कोकणचा ‘राजा’ नैसर्गिक संकटात; मोहोराला बुरशी अन्…; हवामानाचा फटका
आंबा व काजू ही येथील प्रमुख नगदी पिके असून येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे आणि स्थानिक अर्थकारण मोठ्या प्रमाणावर त्यावर अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा बागायतदार यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
-विजय शिंदे,
आंबा बागायतदार, अडखळ, मंडणगड