आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान (फोटो- सोशल मीडिया)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अबिद नाईक यांची मागणी
थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका
नुकसानीचा अहवाल सादर करणे आवश्यक
कणकवली: गेली पाच, सहा वर्षे सातत्याने हापूस आंबा व काजूचे अपेक्षित पिक हातात येत नाही. बदलते हवामान, अवकाळी पाउस, कमी जास्त थंडी याचा थेट परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी सन २०२५-२०२६ मध्ये तर भरपूर मोहोर येऊनही फलधारणा झालेली नाही. तरी याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांसोबत चर्चा करून भरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
अबिद नाईक यांनी शेतकरी, आंबा बागायतदार यांच्या झालेल्या या नुकसानीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच नुकसानीबाबत चर्चाही केली. यात म्हटले आहे की, यावर्षी आंब्याला चांगला मोहोर आल्याने शेतकरी सुखावून व कर्जमुक्त होईल या आशेने चार, पाच महागड्या औषधांच्या फवारण्याही केल्या. मात्र दुर्दैवाने फळधारणा झालीच नाही. बुरशीजन्य खार पडल्याने संपुर्ण मोहोर काळाकुट्ट झाला. कुठेतरी दहा टक्के फळधारणा झाली होती तीही गळून पडली. त्यामुळे विक्रिसाठी सोडाच पण खाण्यासाठी आंबा शिल्लक राहीला नाही. लाखो रूपयांचे खत, औषधे मजूरी फुकट गेलेली आहे. अति थंडीमुळे काजू पिकाचेही मोहर करपल्यामुळे खूप नुकसान झाले आहे.
Alphonso Mango: कोकणचा ‘राजा’ नैसर्गिक संकटात; मोहोराला बुरशी अन्…; हवामानाचा फटका
नुकसानीचा अहवाल सादर करणे आवश्यक
कधीही न डगमगणारा कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच हवालदिल झाला आहे. कोकणातला शेतकरी आत्महत्या कधीच करीत नाही. मुळात कर्जच कमीत-कमी घेउन त्याची वेळीच परतफेड करीत असतो. मात्र यावेळी नियतीने त्याच्यावर क्रूर हल्ला केला आहे. कर्ज सोडाच पण त्याची मजुरीही वसूल होणार नाही. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वस्तुस्थितीची मांडणी केली आहे. नुकसानीची संपूर्ण माहीती दिलेली आहे. मात्र आपल्या कृषी विभागाने वस्तुनिष्ठ परिस्थीतीचे अवलोकन करून त्वरीत आर्थिक नुकसानीचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहाणी करून पालकमंत्री, जिल्हाधिकारी व कृषीविभाग व फलोत्पादन विभाग व कोकण कृषी विद्यापीठ यांची सिंधुदुर्गात आढावा बैठक घेऊन नुकसानीची खात्री करावी. एकत्रित सर्व विभागाचा अहवाल मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केल्याशिवाय योग्य नुकसान भरपाई मिळणे कठीण आहे. तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनाही दिले आहे.






