फोटो सौजन्य - Social Media
Gadchiroli News : नक्षलमुक्तीचे काऊंटडाउन सुरू झाले असले तरी जनतेमध्ये भीतीचे वातावरण अद्याप पूर्णपणे निवळलेले नाही. गडचिरोली जिल्ह्यात एकेकाळी १० उपविभागांमध्ये माओवादी चळवळीने दहशतीचे साम्राज्य निर्माण केले होते. खंडणी, जनअदालती, हत्या, पोलिसांवर हल्ले आणि विकासकामांमध्ये अडथळे अशा घटनांमुळे सामान्य नागरिक भयभीत होते. मात्र गेल्या दोन दशकांत गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या सातत्यपूर्ण नक्षलविरोधी मोहिमा, स्थानिकांचा वाढता पाठिंबा आणि शासनाच्या विविध योजनांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
राज्य शासनाने २००५ मध्ये आत्मसमर्पण योजना जाहीर केल्यानंतर अनेक जहाल माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात प्रवेश केला. आतापर्यंत सुमारे ७९४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, त्यांना पुनर्वसनाच्या माध्यमातून नवे जीवन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि सामाजिक पुनर्स्थापना यामुळे अनेकांनी पुन्हा सामान्य आयुष्य स्वीकारले आहे. विशेष म्हणजे २०२२ ते २०२६ या कालावधीत ११ वरिष्ठ माओवाद्यांसह १२३ जणांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या कारवायांचाही वेग वाढविण्यात आला आहे. २०२१ ते २०२६ या कालावधीत विविध चकमकींमध्ये ९९ माओवादी ठार झाले, तर १४० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमुळे माओवादी संघटनांचे नेतृत्व, भरती प्रक्रिया, आर्थिक पुरवठा आणि शस्त्रसाठा यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे जंगलातील त्यांची पकड मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आहे.
तरीही, नक्षलमुक्तीचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी अजून काही आव्हाने कायम आहेत. दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असून, पूर्ण विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. विकासकामे, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांचा अधिक विस्तार करून शासनाला स्थानिकांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे. एकूणच, गडचिरोलीत नक्षलमुक्तीचे ‘काऊंटडाउन’ सुरू झाले असले तरी ही प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी सुरक्षा, विकास आणि विश्वास या तिन्ही घटकांचा समतोल साधणे अत्यावश्यक ठरणार आहे.






