शीतलकुमार शिंदे, धाराशिव : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सात शाळांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, ग्रामीण व अर्धशहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहे.
राज्यातील एकूण ४०५ शासकीय शाळांना टप्प्याटप्प्याने ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सात शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, केशेगाव (ता. धाराशिव), जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, कसबे तडवळे (ता. धाराशिव), जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, खामसवाडी (ता. कळंब), पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, शिराढोन (ता. कळंब), पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, ईट (ता. भूम), जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पारा (ता. वाशी) आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, होर्टी (ता. तुळजापूर) यांचा समावेश आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश शासकीय शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि डिजिटल साधनांचा प्रभावी समन्वय साधून विद्यार्थ्यांना सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा आहे. प्राथमिक ते दहावीपर्यंत अखंड शिक्षण व्यवस्था उभारण्यावर शासनाचा विशेष भर आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि कौशल्यविकासाला चालना देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. निवडलेल्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग साधने, संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालये, क्रीडा सुविधा, स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय शाळांच्या इमारतींचे सुशोभीकरण, हरित उपक्रम आणि सुरक्षित परिसर निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.
शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण, नवोन्मेषी अध्यापन पद्धती, सातत्यपूर्ण मूल्यमापन प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विज्ञान, गणित, भाषा आणि तंत्रज्ञान विषयांमध्ये विद्यार्थ्यांची गती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रत्येक निवडलेल्या शाळेसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यानुसार निधीची तरतूद आणि कामांची अंमलबजावणी केली जाणार आहे. समूह साधन केंद्र शाळा, पीएम श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समन्वय साधून शाळांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे.
धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश शाळा ग्रामीण भागात असल्यामुळे या योजनेचा थेट लाभ गावांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. शहरांप्रमाणेच दर्जेदार सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सकारात्मक बदल दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत पद्धतीने शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील सात शाळांची या योजनेत निवड झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल होऊन विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याच्या संधी अधिक व्यापकपणे उपलब्ध होणार आहेत.






