
कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करा! मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश, विविध चौक्यांची पाहणी करून केल्या सूचना
मुंबईतील रस्ते दुभाजक, पदपथ दुरुस्ती, दगडी कडा बसवणे यांसारखी दैनंदिन व लहान-मोठी देखभाल-दुरुस्तीची कामे कंत्राटदारांना न देता पालिकेच्या स्वतःच्या मनुष्यबळाचा वापर करूनच पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करून पालिकेच्या आस्थापनेवरील कामगारांचा अधिक प्रभावी व कार्यक्षम वापर करावा, असेही त्यांनी बजावले आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
महापालिकेच्या परिरक्षण चौक्यांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही, अभियंत्यांकडून योग्य पर्यवेक्षण होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी अंधेरी आणि विलेपार्ले परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, कीटकनाशक आणि परिरक्षण चौक्यांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.
मुंबईतील रस्ते देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये नागरिकांना सकारात्मक बदल दिसेल, अशा पद्धतीने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उत्तरदायित्वाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.सर्व २६ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील परिरक्षण चौक्यांमधील मनुष्यबळाचा सखोल आढावा घेऊन क्षेत्रनिहाय कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.या पाहणी दौऱ्यादरम्यान उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले उपस्थित होते.
‘के पश्चिम’ विभागातील नेहरूनगर परिसरात मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कीटकनाशक विभागाने या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून डासांची उत्पत्तीस्थाने तातडीने नष्ट करावीत, तसेच डास प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीवर भर द्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले.
NCP Politics: राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे आक्रमक, पार्थ पवार अचानक उठून गेले; नेमकं घडलं काय?
चौक्यांच्या पाहणीनंतर आयुक्तांनी इर्ला नाला, एसएनडीटी नाला आणि गझदरबांध उदंचन (पम्पिंग) केंद्राला भेट देऊन पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. जुहू येथील इर्ता पर्जन्यजल उदंचन केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले; जेणेकरून मीलन भुयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक आणि जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थितीपासून दिलासा मिळेल. तसेच जुहू समुद्रकिनाऱ्याकडे वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी ‘बँक / फ्रंट बार स्क्रीन’ या यांत्रिक जाळी प्रणालीचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.