कासुर्डी-भरतगाव तलावातील गाळ काढण्यावर नियमांना वाटाण्याच्या अक्षता? स्थानिक पातळीवर अनभिज्ञता (संग्रहित फोटो)
यवत : कासुर्डी-भरतगाव तलावातील गाळ काढण्याबाबत लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद पुणे यांनी स्पष्ट नियम, अटी व शर्ती घालून लेखी परवानगी दिली. असे असतानाही त्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित पत्र तलाठी, मंडल अधिकारी व ग्रामपंचायत भरतगाव यांना देण्यात आले असतानाही स्थानिक पातळीवर त्याबाबत अनभिज्ञता असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायतीकडून गाळ काढण्याची मागणी, त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून मंजुरी आणि १५ अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरपंच ‘आम्ही असे कोणतेही पत्र दिले नाही’ असे सांगत आहेत. तर तलाठी ‘गाळ कोण काढत आहे याची माहिती नाही’ असे म्हणत आहेत. महसूल मंडल अधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे.
PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग, उत्पन्न ६८ लाखांवर
नियम क्रमांक ९ नुसार गाळाचा हिशेब, वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंद व शेतकऱ्यांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे. नियम १२ नुसार तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम होणे अपेक्षित आहे. तसेच नियम १३ नुसार गौण खनिजासंदर्भातील जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आली आहे. तरीही या सर्व नियमांना फाटा देत गेल्या १५ दिवसांपासून तलावात रात्रंदिवस गाळ उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रोज हजारो रुपयांचा गाळ काढला जात असताना स्थानिक प्रशासन अनभिज्ञ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे हा प्रकार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आता पुन्हा तोच प्रकार सुरू
काही वर्षांपूर्वी याच तलावातील गाळ व वाळू उपसातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले होते. मात्र, कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही. आता पुन्हा तोच प्रकार सुरू झाल्याची चर्चा रंगत आहे.






