
पाण्यासाठी म्हसवडकरांचा टाहो, सत्ताधारी व प्रशासन ऐकेल का हो? 10-12 दिवसांनी पाणी...
म्हसवड / महेश कांबळे : म्हसवड शहरात सध्या पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कमालीचा विस्कळीतपणा आला असल्याने १०-१२ दिवसांनी म्हसवडकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, सर्वसामान्य जनता ही पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: टाहो फोडू लागली आहे. मात्र, सुस्त प्रशासन व मस्त सत्ताधाऱ्यांना या सामान्य जनतेचा टाहो ऐकू येत नसल्याने सामान्य जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे.
म्हसवड शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी सामान्य जनतेवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. शहरांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील जनता तर पाण्यासाठी भटकंती करु लागली आहे. मात्र, शहरातील जनतेलाही आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरासाठी जिवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित असली तरी ही योजना आता कालबाह्य झाल्याने या योजनेवरील जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ताब्यात येथील पालिकेची सत्ता आहे. पालिका निवडणुकीपुर्वी याच मंत्री गोरे यांनी म्हसवडकरांना २४/७ असे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या याच शब्दावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून म्हसवडकर जनतेने २१/० अशा स्पष्ट बहुमताने पालिकेची सत्ता ताब्यात दिली आहे. वास्तविक पाहता म्हसवड शहरासाठी मंत्री गोरे यांनी विशेष प्रयत्न करुन वाढीव सुधारित जल योजना मंजुर करुन त्यासाठी म्हसवड पालिकेला कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
या योजनेंतर्गत शहराला पिण्याचे पाणी २४/७ असे राहणार असल्याचे अनेकवेळा सांगण्यात आले आहे. या निधीतून पालिका हद्दीत गेल्यावर्षीच सर्वत्र नवीन जल वाहिनी टाकण्यात आली आहे, तर त्यावरुन प्रत्येकाला नवीन कनेक्शन देण्यासाठी तजवीज केली. नवीन जल वाहिनी टाकल्याने लवकरच आता किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी मिटेल या आशेवर राहून म्हसवडकर जनतेने पालिकेत मंत्री गोरे यांच्या ताब्यात एकहाती सत्ता दिली आहे. ही सत्ता देऊनही ३/४ महिने लोटले आहेत.
सध्या उन्हाचा वाढला तडाखा
सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे, शहराचा पारा जवळवास ४० अंश डिग्री सेल्सिअसकडे चालला आहे. सामान्य जनतेला याचा खूप त्रास होत आहे. अंगातून घामाच्या धारा निघत असल्याने घशाला कोरड पडत आहे. मात्र, कोरड थांबवण्यासाठी लागणारे पाणीच कोठे उपलब्ध नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
Pune News : महापालिका-जलसंपदा विभागात पाण्याच्या बिलावरून वाद; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष