महादेव जानकर महायुतीतून बाहेर (फोटो- ट्विटर)
मुंबई: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहेत. दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच महायुतीला मोठा फटका बसला आहे. कारण महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे टेंशन वाढले आहे.
निवडणुकीपूर्वी महायुतील मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महायुती कमकुवत होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर ही राज्यातील सर्वच २८८ जागा लढवण्यावर ठाम आहेत. २८८ उमेदवार उभे करण्यावर महादेव जानकर ठाम आहेत. महादेव जानकर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. जागावाटपाच्या चर्चेत आपल्याला विचारात घेतले जात नसल्याच्या कारणांमुळे जानकर यांनी महायुतीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
महादेव जानकर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यात आले होते. मात्र जागावाटप करताना विचारात घेत नसल्याने जानकर यांनी महायुती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी महादेव जानकर याच्या पक्षाची ताकद आहे. तसेच धनगर समाज मोठ्या प्रमाणात जानकर यांच्या मागे आहे. त्यामुळे जानकर यांनी साथ सोडणे महायुतीला धोकादायक ठरणार आहे. जातीय आणि राजकीय समीकरण पाहता भाजप आणि महायुतीला जानकर यांची मनधरणी करण्यात यशस्वी होते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
भाजपचे पहिले १० मतदारसंघ ठरले?
भाजपने २५ जागांवर उमेदवार निश्चित केल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार सध्याच्या विद्यमान सरकारमधील काही मंत्र्यांना डावलण्यात आल्याचे समजते आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते आहे. भाजपने निश्चित केलेल्या २५ जणांच्या यादीत फडणवीस आणि पाटील यांचे नाव असल्याचे समजते आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पुण्यातील कोथरूड मंतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी बाकी राहीला आहे. भाजपने पहिल्या यादीतून काही विद्यमान मंत्र्यांना वगळल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आपापल्या मतदारसंघात प्रचार आणि सभा घेऊन मतदारांना आवाहन करण्यासाठी उमेदवारांकडे फारच कमी कालावधी राहणार आहे.