
नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट
नगरपंचायतीच्या तातडीने मुख्याधिका-यांना अतिक्रमणे हटविण्याच्या स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही दिरंगाई न करता कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, या सूचनांनंतरही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. शहरातील अतिक्रमणे जैसे थे कायम असून प्रशासनाने जणू डोळेझाक केल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, शाळा, रुग्णालये आणि मुख्य बाजारपेठ परिसरातही अतिक्रमणांचा फैलाव वाढल्याने आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिकांच्या हालचालींनाही अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
खासदारांच्या स्पष्ट सूचनांनंतरही प्रशासन निष्क्रय का आहे. अतिक्रमण धारकांवर कोणाचा दबाव आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराच्या विकासाला खीळ घालणाऱ्या अतिक्रमणांविरोधात तातडीने मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि वाहतुकीस सुलभ ठेवण्यासाठी नगरपंचायतीने तात्काळ सर्वेक्षण करून व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
कवठेमहांकाळ शहर अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले असताना नगरपंचायत प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसले आहे. खासदारांनी स्पष्ट सूचना देऊनही कारवाई होत नसेल, तर ही प्रशासनाची मोठी निष्क्रयता आहे. भ्रष्ट आणि अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी झाल्याखेरीज नगरपंचायतीचा कारभार सुरळीत होणार नाही.
पांडुरंग पाटील, नेते, शेतकरी विकास आघाडी, कवठेमहांकाळ