सह्याद्रीचा नवा राजा: 'राणोजी'! राधानगरीच्या जंगलात नव्या नर वाघाची एन्ट्री; एक जबदस्त झलक
कराड/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेचा महत्त्वाचा पट्टा ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसरात वाघांच्या उपस्थितीबाबत उत्साहवर्धक घडामोड समोर आली आहे. आधीच नोंद झालेल्या STR-07 आणि STR-08 या प्रौढ नर वाघांनंतर आता STR-10 या नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला ‘राणोजी’ असे नाव देण्यात आले आहे.
वन विभागाने कॅमेरा ट्रॅप्स, पगमार्क्स आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे या वाघाची ओळख निश्चित केली आहे. ‘राणोजी’ सध्या राधानगरी परिसरात स्वतःची स्वतंत्र हद्द (टेरिटरी) निर्माण करत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. या नव्या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या आता दहावर पोहोचली आहे. त्यामध्ये ७ नर आणि ३ मादी वाघांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, सह्याद्रीतील वाघसंख्या ही केवळ कृत्रिम पुनर्वसनावर अवलंबून नसून नैसर्गिक स्थलांतरातून वाढत असल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी-दोडामार्ग ते राधानगरी हा नैसर्गिक वन्यजीव कॉरिडॉर वाघांच्या मुक्त संचारासाठी महत्त्वाचा ठरत आहे. यामुळे त्यांच्या जनुकीय विविधतेचे जतन होत असून, दीर्घकालीन संवर्धनाला बळ मिळत आहे.
वन विभागाकडून वाघांच्या हालचाली, अधिवास, पाणवठे आणि अन्नसाखळी यांचा सखोल अभ्यास सुरू असून भविष्यातील व्यवस्थापन आराखड्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार या प्रकल्पात ठरावीक संख्येने वाघांचे पुनर्वसन करण्याची योजना आहे. त्याअंतर्गत काही मादी वाघीणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प येथून आणण्यात आल्या आहेत. सध्या नर वाघांची संख्या अधिक असल्याने वंशवृद्धीसाठी मादी वाघीणींची गरज अधोरेखित होत आहे.
राधानगरीत आणखी एखादी मादी वाघीण सोडल्यास वाघांची नैसर्गिक वाढ होईल. त्यामुळे संवर्धनासोबत पर्यटनालाही चालना मिळेल. – रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक)
राधानगरी परिसरात वाढती वाघांची संख्या ही पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी ठरत आहे. दाट अरण्य, नैसर्गिक अधिवास आणि समृद्ध जैवविविधतेमुळे हा भाग निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. नियोजनबद्ध ‘इको-टुरिझम’ विकसित केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, सरदार, शिलेदार आणि राणोजी
अशी आतापर्यंत ओळखले गेलेले दहा वाघ आहेत. त्यांची वाढती संख्या आणि स्थिर अधिवास यांमुळे सह्याद्रीतील वाघ संवर्धन प्रयत्नांना यश मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.






