'सैफ अली खान मोदींच्या भेटीसाठी गेला होता म्हणून...'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
सैफ अली खान आणि करीना कपूरने कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दरम्यान मध्यरात्री सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तोच मुद्दा पकडून संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सैफवरील हा हल्ला म्हणजे मोदींना धक्का आहे. कारण १५ दिवसांपूर्वीच सैफ सह कुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता. पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबासोबत एक तास घालवला होता. त्यानंतर सैफवर हल्ला झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. तो मोठा कलाकार आहे. काल पंतप्रधान मुंबईत होते. सगळी सुरक्षा व्यवस्था तिथे असणार. पीएम मुंबईत असले, तरी या राज्यात काय चाललं आहे, हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारला पाहिजे. आम्ही भाष्य केलं की त्यांना यातना होतात. महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाही. घरात, झोपडी, चाळीत कुठेही चोर-दरोडेखोर घुसत आहेत”, असा समाचार त्यांनी घेतला.
“सैफ अली खानला स्वत:ला सुरक्षा व्यवस्था असणार. पण तिथे चोर घुसतात आणि हल्ला करतात हा मोदींना धक्का आहे. 15 दिवसांपूर्वी याच सैफ अली खानने सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. मोदींनी त्यांच्या कुटुंबासोबत एक तास घालवलेला. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला होतो. तो चोराने केला की अन्य कोणी? हा पुढचा प्रश्न. या राज्यात कोणी सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालं आहे. हे गृहमंत्र्यांनी समजून घ्यावं. राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेले आमदार, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्या संरक्षणासाठी दिले जातात. इथे सामान्य माणसाला सुरक्षा नाहीय. पण गद्दार, बेईमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षा आहे”
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच भाषण तुम्ही काळजीपूर्वक ऐका. महायुतीचा कालचा मेळावा नौदलाच्या जागेत झाला. भारतीय नौदलाच्या एखाद्या सभागृहात भाजप किंवा त्यांच्या समर्थक आमदारांचा मेळावा होत असेल, तर इतर पक्षांना अशी संधी मिळणार का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जागेत हा मेळावा होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. या मेळाव्याचे पैसे कोणी भरले?. ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का?. भाजपला ही संधी देत असाल तर आम्हाला सुद्धा मिळाली पाहिजे. पब्लिक प्रॉपर्टी आहे”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, द्वेष भावना ठेऊ नका. भाजप द्वेष भावनेच कोठार आहे. आमदारांना म्हणतात, तुमची प्रतिमा जपा. ज्या पार्टीत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आणि अजित पवार आहेत, त्यांच्यावर मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. हे नेते ज्या मंचावर आहेत, तिथे पक्षाचे प्रमुख सांगतात, प्रतिमेला जपा हा जोक ऑफ द डिकेड, मोठा विनोद आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.