
Bangladesh Prime Minister Tariq Rahman will visit India next week and meet Prime Minister Modi
भारत आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. बांगलादेशचे नवनियुक्त पंतप्रधान तारिक रहमान पुढील आठवड्यात आपल्या पहिल्या अधिकृत दोन दिवसीय भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल होत आहेत. बांगलादेशातील सत्तांतरानंतर पंतप्रधानपद भूषवल्यानंतर तारिक रहमान यांचा हा पहिलाच परदेश दौरा असल्याने नवी दिल्ली आणि ढाका या दोन्ही राजधान्यांमध्ये या भेटीची जय्यत तयारी सुरू आहे. दक्षिण आशियातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्यात होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे प्रमुख एक विशेष द्विपक्षीय बैठक घेणार आहेत, ज्यामध्ये व्यापार, संपर्क (Connectivity), ऊर्जा सहकार्य, सीमा व्यवस्थापन आणि प्रादेशिक सुरक्षा यांसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सर्वसमावेशक चर्चा होणार आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात कटुता आणि तणावाचे सावट निर्माण झाले होते. मात्र, बांगलादेशात नव्याने सत्तेवर आलेल्या बीएनपी (BNP) सरकारने भारतासोबत मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध पुन्हा दृढ करण्याची स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चेतून सकारात्मक संकेत मिळाले असून या दौऱ्यामुळे उभय देशांमधील संबंध पुन्हा पूर्वपदावर येण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उच्चस्तरीय राजनैतिक भेटीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे भारतातील वास्तव्य आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी! ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशातील राजकीय उलथापालथीनंतर शेख हसीना भारतात शरण आल्या होत्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्या दिल्लीत राहत आहेत. दरम्यान, बांगलादेशातील विशेष न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याने, ढाका प्रशासनाने भारत सरकारकडे त्यांच्या औपचारिक प्रत्यार्पणासाठी अधिकृत विनंती पाठवली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS2026: अमेरिकेच्या डॉलरला थेट आव्हान! इराणचा ब्रिक्समध्ये मास्टरस्ट्रोक; रुपया, युआन अन् रुबलमध्ये होणार आंतरराष्ट्रीय व्यापार
भारताने यासंदर्भात स्पष्ट केले आहे की, ते योग्य कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक चौकटीनुसार या मागणीचा अभ्यास करत आहेत. परंतु, अलीकडेच शेख हसीना यांनी दिल्लीतून एका आभासी (Virtual) पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्याने ढाका प्रशासनाने तीव्र आक्षेप नोंदवला होता आणि भारत सरकारकडे निषेध व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्यातील थेट संवादातून या संवेदनशील मुद्द्यावर काय तो तोडगा निघतो का, याबद्दल जगभरातील राजकीय विश्लेषकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या दौऱ्याचा केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातूनही मोठा फायदा दोन्ही देशांना होणार आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान १९९६ मध्ये स्वाक्षरी झालेला ऐतिहासिक ‘गंगा पाणी वाटप करार’ (Ganga Water Sharing Treaty) या वर्षी डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. कराराची अंतिम मुदत अगदी जवळ आल्यामुळे या कराराच्या नूतनीकरणावर (Treaty Renewal) आणि तीस्ता नदी जलवाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या सीमेवरील कृषी आणि मानवी जीवनाशी हा मुद्दा थेट जोडलेला असल्याने यावर सकारात्मक तोडगा निघणे अत्यंत गरजेचे आहे.
याशिवाय, परस्पर व्यापार वाढवणे, ट्रान्सिट आणि पारगमन सुविधा अधिक सुलभ करणे, सीमेवरील घुसखोरी व तस्करी रोखण्यासाठी संयुक्त सीमा व्यवस्थापन मजबूत करणे यांवरही या बैठकीत ठोस निर्णय घेतले जाऊ शकतात. दक्षिण आशियाई देशांमध्ये शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी भारत हा बांगलादेशचा एक नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार आहे, हा संदेश या दौऱ्याच्या माध्यमातून जगाला दिला जाण्याची शक्यता आहे.