
Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? (Photo Credit- AI)
मॉडिफाइड सायलेन्सर बसविलेल्या काही बुलेटमधून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढत शहरातून फिरण्याचा प्रकार नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक होणाऱ्या या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना त्रास होत असल्याचे सांगितले जाते. वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजात वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक विभागाने कठोर कारवाई करावी, तसेच नियमबाह्य सायलेन्सर काढून घेऊन संबंधित वाहनांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध असतानाही शहरातील काही पानटपऱ्यांवर अशा पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका लक्षात घेता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त होत आहे. गुटखा नेमका कुठून येतो, त्याचा पुरवठा कोण करतो आणि शहरातील कोणत्या ठिकाणी त्याची विक्री होते, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तसेच संबंधित अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरात चोरीच्या घटनांबाबतही नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. एखाद्या घटनेनंतर तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरते; मात्र सीसीटीव्ही उपलब्ध नसलेल्या भागांमध्ये तपासाची दिशा थांबता कामा नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. स्थानिक माहितीचे जाळे, तांत्रिक तपास, संशयितांची चौकशी, चोरीच्या मालाची विक्री कुठे झाली याचा मागोवा आणि पूर्वीच्या गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती या माध्यमातूनही तपासाला दिशा देता येऊ शकते. त्यामुळे तपास यंत्रणेने पारंपरिक तपास पद्धतींसह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे.
वाई शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे युवक, अल्पवयीनांकडून वाहनचालकपणाचे प्रकार, मॉडिफाइड सायलेन्सरचा त्रास, गुटखा विक्री आणि चोरीच्या घटनांबाबत नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे केवळ कारवाईच्या घोषणा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर नियमित तपासणी आणि दोषींवर ठोस कारवाई दिसणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “पोलीस यंत्रणा आहे; मात्र तिचा धाक जाणवला पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झाली, तरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल,” अशी अपेक्षा वाईकरांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या सर्व तक्रारींची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शहरात विशेष मोहीम राबवावी आणि कायदा-सुव्यवस्थेचा धाक पुन्हा निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात