
फोटो सौजन्य सोशल मीडिया
Satara Politics : जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीतील राजकीय घडामोडींसह पुनर्वसन, पर्यटन विकास, पालकमंत्रिपद आणि जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
जावळीतील विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांमध्ये सुरुवातीपासून आपण हस्तक्षेप केला नाही. गावपातळीवर चर्चा करून ठराव पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. अनेक गावांचे ठराव चर्चेनंतर पाठविण्यात आले आहेत. मात्र आखाडे येथील प्रकारानंतर कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याने आपण भूमिका घेतल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड
आखाडे येथील कार्यकर्त्यांना विरोधकांकडून दमदाटी आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः तेथे जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र त्याचे रूपांतर दहशतीत होऊ नये. कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
“संघर्ष हा राजकारणाचा भाग आहे. आम्हीही संघर्षातूनच पुढे आलो आहोत. त्यामुळे कोणाकडूनही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल,” असे शिवेंद्रसिंहराजे यांनी ठणकावून सांगितले.
वाई व जावळी परिसरातील काही गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरही त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी चर्चा केली. संबंधित गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित भूमिका घेतली असून, गावठाणासह आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे प्रस्ताव लवकरच मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठोसेघर-भांबवलीचा पर्यटन नकाशा विस्तारण्याचा प्रयत्न
ठोसेघर आणि भांबवली परिसराच्या पर्यटन विकासासाठी शासनाकडून साडेसहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. केवळ ठोसेघर धबधबा हा केंद्रबिंदू न ठेवता परिसरातील इतर निसर्गस्थळे आणि पर्यटनक्षेत्रांमध्येही सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रस्ते, पर्यटक सुविधा आणि अन्य पायाभूत कामांसाठी प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे द्यावे, अशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेली मागणी चर्चेत आली होती. त्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी या विषयाला फारसे महत्त्व न देता भाजपच्या वरिष्ठ पातळीवर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या यापूर्वीच झाल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या पालकमंत्रिपदात बदल होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबतही शिवेंद्रसिंहराजे यांनी सध्या कोणतेही राजकीय भाकीत करण्यास नकार दिला. मतदार याद्या, त्यावरील हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असली तरी अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतरच बँकेच्या राजकारणाबाबत भूमिका मांडणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.
जावळीतील सोसायटी ठरावांच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला आहे.