
Shambhuraj Desai (Photo Credit - X)
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सावधपणे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका देसाई यांनी मांडली. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्यांच्या अधिकारकक्षेबाबत भाष्य करणे मला उचित वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असतानाच देसाई यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या संभाव्य रस्सीखेचीत थेट भूमिका न घेता त्यांनी निर्णयाचा चेंडू महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात टाकला आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणावरून महायुतीतील घटकांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांबाबतही देसाई यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये यासंदर्भात बैठक झाल्याचे सांगितले. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे जाहीर करणे उचित ठरणार नाही. मात्र, बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच संबंधित वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले होते, असे देसाई यांनी नमूद केले.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण महायुती धर्माचे पालन करीत असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत कितीही तर्कवितर्क सुरू असले तरी वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय हाच आपल्यासाठी अंतिम राहणार असल्याचा संदेश त्यांच्या वक्तव्यातून मिळाला.
दरम्यान, सातारा पालकमंत्रिपदाची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपविली जाणार, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. देसाई यांनी स्वतःहून कोणतीही दावेदारी किंवा अपेक्षा व्यक्त न करता अत्यंत सावध भूमिका घेतल्याने पालकमंत्रिपदाच्या चर्चेला आणखी वेग आला आहे. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात, याकडे साताऱ्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजपचा जल्लोष; ‘निर्लज्ज लोक’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल