घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
मेढा : दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ही चिंताजनक बाब असून, शिक्षकांनी याचे खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शाळांचा भौतिक दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात येत असूनही शिक्षकांनी सर्वोत्तम काम करून शाळांचा पट वाढवण्यावर भर द्यावा, असे देखील जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले.
जावली पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील एकूण ३२ शिक्षक, केंद्रप्रमुख, गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांच्या गुणगौरव समारंभात मानकुमरे यांनी शिक्षकांना आपल्या खास शैलीतून शिक्षकांना कानपिचक्या दिल्या. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य जयश्री गिरी, कविता ओंबळे, सभापती सौरभ शिंदे, पंचायत समिती सदस्या चारुशीला पवार, सुनीता दूदळे, शिल्पा शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष संदीप परामणे, मारुती चिकणे, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, शिक्षक संघाचे नेते मच्छिंद्र मुळीक आदी उपस्थित होते.
यावेळी सौरभ शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर शिक्षकांनी खरंतर भर द्यावा. स्पर्धा परीक्षांशिवाय मुलांना पर्याय उरलेला नाही. त्यामुळे गुणवत्ता ही तितकीच गरजेची बाब झाली आहे. यावेळी तालुक्यातील एकूण ३२ शिक्षकांचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
अनेक शिक्षकांना राजकारणाचे लागलेत डोहाळे
खरंतर आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिकवून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत निवांत राहायला हवे. मात्र, सेवानिवृत्त होताच शिक्षक राजकारणाच्या आखाड्यात उतरत असतील तर आमच्या सारख्या राजकारण्यांनी नेमकं करायचे तरी काय? असा मिष्किल व बोचरा सवाल तालुक्यात नव्याने स्वयंघोषित राजकारणात येऊ पाहणाऱ्या शिक्षक नेत्यांना मानकुमरे यांनी लगावला. त्यामुळे खरंतर शिक्षकांनी त्यांच्या या सल्ल्याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, अशीच चर्चा उपस्थितांमध्ये यावेळी रंगली.






