मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान
पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक
शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही
बारामती: मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केले.ते शुक्रवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले, “मला असे वाटते की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मला यामध्ये राजकारण आणायचे नाही. पण पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली. पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून आलेली नाही. आजचा जो दिवस आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला.”
शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “तो निर्णय म्हणजे आजचा दिवस साजरी करायची नाही. कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होती. काही ठिकाणी पूर काही ठिकाणी महापूर होता. याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली आहे. तिथली जमिनी खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्यादृष्टीने शेतीची जमीन हे त्याचे सर्वस्व आहे. त्याचे सर्वस्व वाहून गेले आहे. कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार? म्हणून त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायचा निर्णय घेतला. संकट येतात पण अशावेळी ज्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची जबाबदारी असते लोकांना संकटातून बाहेर काढणे हातभार लावायचा. आजच्या राज्य सरकारने काही तोतडी रक्कम काही लोकांना जाहीर केली. पण नुकसानीच स्वरूप बघितलं तर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे.”
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’; समितीकडून CM Relief Fund ला 1 कोटींची मदत
पुरंदर विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाबाबत शरद पवार म्हणाले, “मोबदला हा विषय नाही. काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, विमानतळाची जागा बदला. हा निर्णय मी किंवा सरकारी अधिकारी घेऊ शकत नाहीत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. विमानतळ कुठे काढायचं हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल. प्रश्न असा आहे जिथे विमानतळ बांधण्यात येईल, तेथील शेतकऱ्यांची शेती ताब्यात घेतली जाईल. अशा सर्वांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई कशी दिली जाईल याबाबत शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. चर्चेत मी एवढंच सांगितलं कोणीही गैर कायद्याने शेतकऱ्यांची जमीन काढू शकत नाही. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन द्याव्यात ही त्यांची मागणी होती. मी मुख्यमंत्री पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की, तुम्ही या कामाच्या संदर्भात लोकांचे उपस्थितीत यातून काहीतरी मार्ग काढा. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईल ते सांगतील तेव्हा या विषयावर बोलू.”