
मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण या सात गावात विमानतळ प्रकल्प करण्यात येत असून, शासनाकडून ९६ टक्के शेतकऱ्यांची समती असल्याचे सांगितले जात आहे. याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यानंतर लगेच दुसरी बैठक घेवून प्रकल्पाला लागणारा निधी सहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तरतूद जाहीर केली आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांना पुरंदरच्या प्रांतांकडून मोजणी झालेल्या शेतकऱ्यांना नोटीस देण्याची कार्यवाही सुरु केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता भूसंपादन विभागाचे अधिकारी यांनी उदाचीवाडी आणि परगावच्या हद्दीत जाऊन ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा होत संबंधित अधिकाऱ्यांना कडाडून विरोध केला. तसेच आम्हाला विश्वासात न घेता तसेच कोणती ही नोटीस न देता आमच्या जमिनीची परस्पर मोजणी का सुरु केली ? असा जाब विचारला.
तसेच शेतकऱ्यांनी जमून अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यामुळे त्यांना कामच करता येईना. त्यानंतर काही वेळाने पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत स्वतः त्या ठिकाणी जाऊन शासकीय जमिनीची मोजणी सुरु असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर शेतकऱ्यांनी जर शासकीय जमिनीची मोजणी केली असेल तर तशी कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली. आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही. आमचा या विमानतळाला विरोध आहे. आमची सुजलाम सुफलाम जमीन तुम्ही भुरळ पाडून घेत आहात. असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.