
म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा कोट्यवधींचा घोटाळा; अनिल परब यांचा गंभीर आरोप
मुंबई : नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात भूखंडांची बेकायदेशीर पोटविभागणी करून म्हाडाच्या राखीव जागांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. नाशिक महापालिका हद्दीत नियमांच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी विकासक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडण्यात आल्याचे अनिल परब यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी ४९ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, १८ ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल समोर येणार असल्याची ग्वाही दिली आहे.
अनिल परब म्हणाले, नाशिकसह महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात १९८१ च्या परिपत्रकाचे उल्लंघन करून जमिनीची पोटविभागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. ना हरकत प्रमाणपत्र न घेताच ४ हजार चौ. मी. पेक्षा लहान प्लॉट पाडले गेले. ७/१२ वेगळे करून ले-आऊट मंजूर करताना म्हाडाचे २० टक्के राखीव, १० टक्के ओपन स्पेस आणि ५ टक्के सुविधा क्षेत्रही नाहीसे करण्यात आले. २०१३ पासून १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये विकासक, अधिकारी आणि नगररचना विभागाच्या संगनमताने हा घोटाळा सुरू आहे. शासनाने एमआरटीपी कायद्यानुसार सखोल चौकशी करून बेकायदेशीर ले-आऊट रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी परब यांनी केली आहे.
दोषी बिल्डरांकडून जमीन कशी परत घेणार?
अनिल परब म्हणाले, नाशिक महापालिकेत नियमांतून पळवाट काढत जमिनीचे तुकडे पाडण्यात आले. अशी २००० प्रकरणे झाली आहेत. ४९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाकी लोकांवर काय कारवाई केली? पिंकेश शहा या बिल्डरने १६४ फ्लॅट म्हाडाला दिले नाहीत. याचा हिशोब किती होतो, हे पाहा. या बिल्डरांनी ढापलेली जमीन परत कशी घेणार आहात? असे प्रकार केवळ नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहेत. दोषींवर आपण काय कारवाई करणार आहात, अशी विचारणा देखील परब यांनी केली आहे.
१८ ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल येणार
अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, या प्रकरणात आतापर्यंत ४९ लोकांवर कारवाई झाली आहे आणि त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये उपअधीक्षक, नायब तहसीलदार यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत.