
Rohit Pawar
महाराष्ट्रातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात उद्योगांची संख्या वाढत असल्याचा सरकारकडून दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात किती कंपन्या महाराष्ट्रात आल्या आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले, याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
मुख्यमंत्री 3 जून 2026 च्या आकडेवारीचा हवाला देत महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक उद्योग असल्याचे सांगत आहेत. गेल्या वर्षभरात 41 हजार 500 कंपन्या राज्यात आल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, 2014 नंतर प्रत्यक्षात महाराष्ट्रात किती कंपन्या आल्या? असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
चाकणमधील उद्योगांवरूनही रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना आव्हान दिले. चाकणमधून कोणताही उद्योग बाहेर जाणार नसल्याचा सरकारचा दावा असेल, तर विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याची टीका करण्याऐवजी समोरासमोर संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी, असे ते म्हणाले. महाराष्ट्राची सध्याची आर्थिक परिस्थिती पुराव्यांसह आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
डेटा सेंटरमधील गुंतवणुकीवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. मोठ्या गुंतवणुकीच्या तुलनेत डेटा सेंटरमधून मर्यादित रोजगार निर्माण होतात, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणारे उत्पादन क्षेत्रातील उद्योग अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
2022 ते 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील FDI मध्ये 18 टक्के वाढ झाल्याचा दावा करत रोहित पवार यांनी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची कामगिरी कमी असल्याचे म्हटले. हरियाणा, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील FDI वाढीची आकडेवारीही त्यांनी सरकारसमोर ठेवली.
डावोस येथे झालेल्या करारांचा संदर्भ देत किती कंपन्यांनी प्रत्यक्ष महाराष्ट्रात उद्योग सुरू केले आणि किती रोजगार निर्माण केले, याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील उद्योगांना तुलनेने जास्त औद्योगिक वीजदराचा फटका बसत असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. त्यामुळे वाढती गुंतवणूक, उद्योगांचे स्थलांतर आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर सरकारने स्पष्ट आकडेवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.